गांधीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना गुजरात या त्यांच्याच बालेकिल्ल्यात आव्हान देण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सज्ज झाले असून त्यांनी सध्या आपला मुक्काम गुजरातमध्येच हलवला आहे. दरम्यान, त्यांच्या छोट्या सभा आणि भेटीगाठींचे कार्यक्रमही गुजरातमध्ये सुरू आहेत. त्याचदरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी खळबळजनक दावा केला आहे. कॉंग्रेस पक्ष संपला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना केजरीवाल म्हणाले की, केवळ दोन महिने राहिले आहेत. गुजरातमधून आता भारतीय जनता पार्टीचे सरकार जाणार असून आम आदमी पक्ष येणार आहे. आम्ही या राज्यातील सगळ्याच जागांवर निवडणूक लढवणार आहोत. कॉंग्रेसने केलेल्या आरोपांबाबत बोलताना ते म्हणाले की, कॉंग्रेस संपली आहे, त्यांच्याबद्दल प्रश्न कशाला विचारता, असा प्रतिसवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, गेले काही महिने मी गुजरातमध्ये फिरतो आहे.
लोकांना भेटतो आहे. काही सभाही घेतल्या. वकील, शेतकरी, रिक्षाचालक, व्यापारी असे सगळ्यांशी बोललो. सगळ्यांनीच मला सांगितले की गुजरातमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. कोणतेही काम करून घ्यायचे असेल तर पैसे द्यावे लागतात. खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचार आहे.
त्यांच्या विरोधात काही बोललो तर धमकावण्यासाठी आणि घाबरवण्यासाठी लोक घरी पोहोचतात, असेही या मंडळींनी आपल्याला सांगितले. व्यापारी, उद्योगपतींना छापे टाकण्याची धमकी दिली जाते. तुमचा धंदा बंद करू असे त्यांना धमकावले जाते. चारही बाजूंना भ्रष्टाचार आणि दादागिरी आहे. मात्र, आम आदमी पक्षाचे सरकार आले तर भ्रष्टाचार आणि भयमुक्त प्रशासन आम्ही देऊ अशी हमी मी देतो, असे त्यांनी आश्वासन दिले.
आमचा मंत्री, आमदार, खासदार कोणालाही भ्रष्टाचार करू देणार नाही. जो भ्रष्टाचार करेल त्याला तुरुंगात टाकू. गुजरातच्या जनतेचा पैसा गुजरातच्या जनतेच्या भल्यासाठीच खर्च करू. मी गुजरातच्या लोकांना मोफत वीज देण्याचे बोललो तर भाजप त्याला विरोध का करते आहे, मी येथील शाळा आणि रुग्णालयांची स्थिती सुधारण्याच्या गोष्टी करतो तर त्याला भाजप का विरोध करत आहे, असा सवालही केजरीवाल यांनी केला.