जयेश राणे
सोशल मीडियावरील अति जवळीक अनेकांची आर्थिक फसवणूक होण्यास कारणीभूत ठरली आहे. असे होऊनही अनेकांचे डोळे उघडत नाही. अंधविश्वासाचा तीव्र पगडा असल्याने विश्वासघात झाल्यावरच जे डोळे उघडतात, ते मात्र कायमचे उघडेच राहतात. कारण कटू अनुभवातून गेल्याने त्याचे चटके काय असतात, याची जाणीव झालेली असते. मैत्री वगैरे काही नसते असते ती केवळ शारीरिक, आर्थिक भूक.
पोलिसांच्या सायबर सेलचे काम सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. सोशल मीडियावरून चांगल्या गोष्टी किती प्रमाणात होत असतील? त्याचप्रमाणे या माध्यमाचा उघडपणे दुरुपयोगही किती प्रमाणात होत असेल? असे दोन प्रश्न आहेत. पहिला प्रश्न या माध्यमाचा गैरवापर करणाऱ्या भामट्या लोकांसाठी निरर्थक आहे. या माध्यमावरून होणाऱ्या चांगल्या गोष्टींचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र, वाईट गोष्टी माध्यमाच्या दुरुपयोगाची खोली किती आहे, हे निदर्शनास आणतात. वरकरणी मैत्री दिसत असते मात्र मनात वेगळाच कट शिजत असतो.
मैत्री ही कायम निःस्वार्थी असते. त्यात एकमेकांना साहाय्य करण्याचा मुख्य भाग असतो. तीच मैत्री कायम टिकते. सध्याची मैत्री ही बहुतांशपणे कोणत्या तरी स्वार्थावर अवलंबून असल्याचे घडत असलेल्या विविध घटनांवरून लक्षात येते. त्यामुळे काहीजणांचा मैत्री या शब्दावर विश्वासच राहिलेला नाही. माझी केवळ तुमच्याशीच जवळीक आहे, मी तुमच्याकडेच माझे मन मोकळे करू शकते, मला समजून घ्या अशा काही चित्रपटातील वाक्यांचा उपयोग करून समोरच्याला जाळ्यात ओढणे सोपे जाते. त्यामुळे अशा प्रकारे वारंवार उपरोक्त वाक्यांचा उपयोग करणारे खरंच जीवलग मैत्री करू इच्छित आहे का? याकडेही लक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे.
काही महिन्यांपूर्वीच “इन्स्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमावरून ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. याप्रकरणी नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. आरोपीने पीडितेची मोबाइलवर ध्वनिचित्रफीत तयार केली होती आणि ती समाजमाध्यमांवर पसरविण्याची धमकी तो तिला वारंवार देत होता. अशा प्रकारे धमकावून आरोपी अल्पवयीन मुलाने पीडितेच्या पालकांकडून एक कार आणि दोन महागडे मोबाइल घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील दोन्ही अल्पवयीन हे नवी मुंबईत राहणारे आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आरोपीने पीडित मुलीचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर अश्लील ध्वनिचित्रफीत तयार केली.
अल्पवयीन मुलाने एवढ्यावरच न थांबता ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवर पसरविण्याची धमकी पीडितेला वारंवार दिली. दर वेळी तो पीडितेकडून रोख रक्कम उकळत होता, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्याच्याकडील रक्कम संपल्यानंतर त्याने तिला पुन्हा धमकावले आणि तिच्या पालकांचे क्रेडिट कार्ड चोरून आणण्यास भाग पाडले. त्याचा “पासवर्ड’ घेत त्यावरही मोठ्या प्रमाणात खरेदी केली. यात दोन महागडे मोबाइल आणि कारचा समावेश आहे. क्रेडिटवर पैसे खर्च केले जात असल्याने तिच्या पालकांनी याबाबत सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पीडितेला तिच्या गावी पाठवले व ती घरातून गेल्याने तिच्या पालकांनी अपहरणाचा गुन्हा नोंद केला. त्यावेळी तांत्रिक तपास करून केलेल्या चौकशीत हा सर्व प्रकार समोर आला. खरेदी केलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
घटना आणि ती घडवणारा अल्पवयीन तसेच त्यातील अल्पवयीन मुलगी. हा सर्व भाग लक्षात घेता घटनेतील नावीन्य म्हणजे मुलाने लबाडी करून दोन महागडे मोबाइल आणि कार खरेदी करणे.
वयाने अल्पवयीन आणि काम मात्र एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे करण्यात चलाख. सोशल मीडियावर किती चलाख लोकांचा वावर असतो?, हे येथे लक्षात येते. स्वतःला नेमके काय करायचे आहे याची त्यांना पूर्ण कल्पना असते. मात्र, या भामट्यांना कसे ओळखायचे ?, त्यांच्यापासून चार हात लांबच कसे राहायचे?, याविषयी सुशिक्षित मंडळीच अडाणी असतात, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण या माध्यमाचा सर्वाधिक उपयोग हीच मंडळी करत असतात. त्याचा उपयोग चॅटिंग करण्यासाठीच अधिक होत असल्याने समोरच्या पुढे आपली सर्व माहिती खुली करण्याचा खुळचटपणा केला जातो. “अति शहाणा त्याचा बैल रिकामा’ असे म्हणतात ते असे.
सोशल मीडियाचा उपयोग सतर्कपणे केल्यास अधिक गुन्हे टळणार. असे असूनही त्याकडे दुर्लक्ष करून स्वतःला पाहिजे तेच खरे केले जाते. त्यामुळे “तेलही गेले तूपही गेले हाती राहिले धुपाटणे’ असे होते. त्यामुळे निराशेत जाणे, आत्महत्या करणे आदी टोकाचे निर्णय घेतले जातात. मात्र असे करू नये. आयुष्य अनमोल आहे, ते आपल्या चुकीमुळे मातीमोल होणार नाही याकडे लक्ष द्यावे.