अन्यथा कायदेशीर परिणाम भोगा- चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा
कोल्हापूर, (प्रतिनिधी) – भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप आला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे तर महा विकास आघाडी अर्थात कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि दुसरीकडे भाजपा या दोघांमध्ये देखील चांगलेच आरोप-प्रत्यारोप गेल्या दोन दिवसापासून रंगले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मोर्चाच्या निमित्ताने कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी सरकारला चांगलाच इशारा दिला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी छखसंपूर्ण सहकार्य करा अन्यथा कायदेशीर परिणाम भोगा, असा सज्जड दम चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी आमची कुणाचीही चौकशी केली, तरी आम्ही त्याला घाबरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भीमा कोरेगावप्रकरणी केंद्र शासनाच्या चौकशी समिती म्हणजे “एनआयए’ला राज्य सरकारने सहकार्य केले पाहिजे, अन्यथा कायदेशीर परिणाम भोगावे लागतील. देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला तुम्हाला कुणी अडवले आहे ?आम्ही स्वच्छ आहोत. तसेच तुम्हाला जी काही चौकशी करायची आहे ती लवकर करा, असे थेट आव्हानच त्यांनी सरकारला दिले. या सरकारमध्ये एकमेकांचे एकमेकांवर वजन आहे. त्यामुळे त्यांचे तेच पडतील, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
महाआघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हेच स्वतः मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात. ते स्वतःच सगळ्या घोषणा करतात, अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली.