नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. देश पातळीवर सरासरी कांद्याच्या दरात 57 टक्क्यांची वाढ झाली आहे.
दरम्यान, या कांद्याच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या कांदा 47 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बफर स्टॉकमधून कांद्याची किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून ग्राहकांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी याच कालावधीत कांद्याची सरासरी किरकोळ किंमत 30 रुपये प्रति किलो होती. त्यामध्ये सध्या वाढ झाली आहे.
दरम्यान, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कांद्याच्या दरात घसरण होणार आहे. याबाबत माहिती देताना कुमार सिंह म्हणाले, आम्ही ऑगस्टच्या मध्यापासून बफर स्टॉकमधून कांदे उपलब्ध करून देत आहोत.
किंमती वाढू नयेत आणि ग्राहकांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही किरकोळ विक्री वाढवत आहोत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ज्या राज्यांमध्ये किंमती झपाट्याने वाढत आहेत, तेथे घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारांमध्ये बफर स्टॉकमधून कांद्याचा पुरवठा केला जात आहे. ऑगस्टच्या मध्यापासून 22 राज्यांतील विविध ठिकाणी सुमारे 1.7 लाख टन कांद्याचा बफर स्टॉकमधून पुरवठा करण्यात आला.
किरकोळ बाजारात, नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल ऍग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया या दोन सहकारी संस्थांच्या माध्यमातून बफर स्टॉकमधील कांदे 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विकले जात आहेत. दिल्लीतही बफर स्टॉकमधील कांदा त्याच सवलतीच्या दराने विकला जात आहे.
कांद्याचे भाव का वाढले?
मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हवामानाशी संबंधित कारणांमुळे खरीप कांद्याच्या पेरणीला उशीर झाल्यामुळं पीक कमी झाले. हे पीक बाजारात यायला उशीर झाला. सध्या खरीप कांद्याची आवक सुरु व्हायला हवी होती,
मात्र तसे झाले नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. साठवलेला रब्बी कांदा संपल्याने आणि खरीप कांद्याची आवक होण्यास उशीर झाल्यामुळं पुरवठ्याची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळं घाऊक आणि किरकोळ बाजारात भाव वाढत आहेत.
बफर स्टॉक “दुप्पट’
सरकारने चालू वर्ष 2023-24 मध्ये कांद्याचा बफर स्टॉक दुप्पट केला आहे. यामुळे देशांतर्गत उपलब्धता सुधारेल आणि आगामी काळात वाढत्या किमतींना आळा बसेल. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने पाच लाख टनांचा बफर स्टॉक ठेवला आहे. येत्या काही दिवसांत अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदी करण्याची योजना आहे.