मंचर (प्रतिनिधी) – कांद्याचे बाजारभाव काही प्रमाणात वाढले आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि. 5) गोळा कांद्याला 475 रुपये दहा किलोस तर एक नंबरच्या कांद्यास 400 ते 450 रुपये भाव मिळाला आहे. बाजारभाव वाढल्याने शेतकरी आपल्या बराकीतील कांदा मार्केटमध्ये आणत आहेत, अशी माहिती बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.
कांद्याचे बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील दोन वर्षांपासून कांदा पिकाने शेतकऱ्यांना रडवले होते. कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत होता. आता कुठे कांद्याला चांगला बाजारभाव मिळू लागला आहे. मागील महिन्यात दहा किलोस 500 रुपयांचा टप्पा पार केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना “अच्छे दिन’ येणार असताना सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता. परिणामी कांदा पिकाचे बाजारभाव कमी होऊ लागले होते. मार्केटमध्ये कांद्याची आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आठवड्यतील रविवार, मंगळवार व गुरुवार या दिवशी कांद्याची लिलाव पद्धतीने विक्री होते.
मंगळवारी लिलाव सुरू झाल्यानंतर कांद्याचे भाव काही प्रमाणात वाढले. बाजार समितीत कांद्याची एकूण एक हजार पिशवी आवक झाली. सततच्या पावसाने कांदा पीक खराब झाले आहे. परिणामी आवक कमी झाल्याने बाजारभाव वाढले आहेत. गोळा कांदा 475, एक नंबरचा 400 ते 450, दोन नंबरचा 380 ते 400, गोलटी कांदा 350 तर बदला कांदा 150 ते 250 रुपये 10 किलोसाठी भाव मिळाला आहे. कांद्याच्या भावात वाढ झाल्याने हॉटेलमधील खवय्यांसाठी असणारी
कांदा भजी दिसेनाशी झाली आहेत तर गृहिणी स्वयंपाक करताना कांद्याचा काटकसरीने वापर करीत आहेत.