परतीच्या अतिवृष्टीमुळे यंदा उत्पादन घटण्याची शक्यता
चिंबळी – खेड तालुक्याच्या दक्षिण भागात परतीच्या पावसाने आता विश्रांती घेतली असून त्याची “एक्झीट’ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवर भर दिला आहे. दक्षिण भागातील चिंबळी, मरकळ, गोलेगाव, सोळू, धानोरे, वडगाव घेनंद, चऱ्होली खुर्द, केळगाव, कुरुळी, मोई, निघोजे भागामध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन व इतर पिकांची काढणी करून रब्बी हंगामातील कांदा पिकाची लागवड सुरू केली आहे.
मात्र शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी कुटुंबासह स्वत:च शेतात राबत आहे. खेडच्या दक्षिण भागात गेल्या महिन्याभरापासून मुसळधार पावसाने झोडपले असल्याने यावर्षी कांदा रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा लागवड करण्यासाठी रोपे कमी असल्याने कांदा लागवड यावर्षी कमी प्रमाणात होणार असल्याने यंदा उत्पादन घटणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.