लोणावळा, दि. 3 (वार्ताहर)- लोणावळा बाजारपेठेतील वाहतूककोंडी समस्या सुटावी,याकरिता लोणावळा शहर पोलीस व लोणावळा नगरपरिषद यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंद्रायणी पुल भांगरवाडी दरम्यान एकेरी वाहतूक सुरु केली. काही दिवस एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी झाल्यानंतर आता मात्र तो फक्त कागदोपत्री राहिला आहे. शहरात एकेरी वाहतूक सुरू केली आहे, याचा पोलीस व नगरपरिषद प्रशासनासह नागरिकांना देखील विसर पडल्याने दिवसरात्र सर्रास वन वे मधून वाहनांची वाहतूक सुरु असल्याने पुन्हा एकदा वाहतूककोंडी होऊ लागली आहे.
लोणावळा शहरातील बाजारपेठ भागात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरात. 18 जुलैपासून एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी करण्यास सुरूवात करण्यात आली. पूर्वी केवळ विकेंडला तसेच आठवडे बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडी बघायला मिळत असे. पण आता आठवड्यातील सातही दिवस नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागतो होता. काही वर्षापूर्वी लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भांगरवाडी इंद्रायणी पुल दरम्यान एकेरी वाहतुकीचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला होता. करोना काळात व त्यानंतर पंडित नेहरु रोडचे काम यामुळे ही एकेरी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र पुन्हा एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली होती.
इंद्रायणी पुलाजवळ केवळ चार दोन बॅरेकेट्स लावून ठेवण्यात आल्या आहेत. मात्र पोलीस कर्मचारी अथवा वॉर्डन त्याठिकाणी नसल्याने वाहने सर्रास वन वे मधून जात आहेत. लोणावळा बाजारपेठेतील वाहतूककोंडी समस्या सुटावी, याकरिता लोणावळा नगरपरिषदेने पोलीस प्रशासनाला मदतीसाठी 12 वॉर्डन दिले. यापैकी 9 जण सध्या कार्यरत आहेत. त्यापैकी एकही वॉर्डन अंमलबजावणीसाठी कार्यरत नाही. ज्या उद्देशाने वॉर्डन दिले आहे ते काम होणार नसेल तर त्याच्या पगारावर होत असलेला लाखभर रुपयांचा खर्च दरमहा वाया जात आहे. तो तरी थांबवावा अशी मागणी सजग नागरिक करत आहेत.
पोलीस, वॉर्डन नसल्याने वाहनचालक सुसाट
छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच इंद्रायणी पुल येथे पोलीस व वॉर्डन तैनात करण्यात आले होते. तसेच एकेरी वाहतुकीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस निरीक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी देखील होते. मात्र आता ट्रॅफीक वॉर्डनदेखील तैनात नसल्याने या रस्त्यावर सर्रासपणे दुहेरी वाहतूक सुरू आहे.