रुग्णांचाही आलेख वाढतोय; प्रशासन परिस्थिती हाताळण्यात अपयशी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तसेच रुग्णांच्या मृत्यूचा दरही वाढता आहे. शहरामध्ये दर तासाला एका बाधित रुग्णाचा मृत्यू होत आहे. गेल्या आठ दिवसांतच शहरामध्ये तब्बल 197 जणांचे प्राण गेले आहेत. या आकडेवारीमुळे करोनाची वाढती परिस्थिती हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचेच स्पष्ट झाले आहे.
देशातील एकूण करोनाबाधित मृत्यूच्या प्रमाणापैकी तब्बल दीड टक्के रुग्ण हे एकट्या पिंपरी चिंचवड शहरातील आहेत. तर शहरामध्ये दर तासाला एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू होत आहे. शहरात 31 जुलै रोजी 421 रुग्णांचा मृत्यू झाले होते. त्यामध्ये शहरातील 335 तर शहराबाहेरील 86 रुग्णांचा समावेश होता. यानंतर मात्र गेल्या 21 दिवसांमध्ये मृत्यूचे प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.
गेल्या 21 दिवसांमध्ये शहरात 502 रुग्णांचे प्राण गेले आहेत. तर मागील आठ दिवसांमध्ये 197 जणांचा मृत्यू झाला आहे. आठ दिवसांच्या 192 तासांमध्ये 197 रुग्णांचा मृत्यू म्हणजेच शहरामध्ये दर एक तासाला एका रुग्णाचा प्राण जातोय, हेच स्पष्ट झाले आहे.शहरातील करोनाबाबतची परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्णसंख्याही सातत्याने वाढत आहे. असे असताना प्रशासन मात्र मृत्यूदर रोखण्यामध्ये अपयशी झाले आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारने करोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होणार नाही याकडे जास्त लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र शहरातील रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे.
तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली
सद्यःस्थितीमध्ये शहरात 9,407 रुग्ण लक्षणेविरहीत आहेत. तर लक्षणे असेल्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील 600 रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. तर तीव्र लक्षणे मात्र प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांची संख्या 136 इतकी आहे. तसेच 58 रुग्णांमध्ये अतितीव्र लक्षणे आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
मृत्यूदर 2.83 टक्के
शहरात 15 ऑगस्ट या दिवसापर्यंत 34,447 इतकी रुग्णसंख्या होती. तर मृत्यू 599 होते. म्हणजेच शहरातील करोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर 1.73 टक्के होता. त्यामध्ये आठ दिवसांमध्ये वाढ झाली आहे. आज शहरातील रुग्णसंख्या 40,898 असून मृत्यू 771 आहेत. म्हणजेच गेल्या आठ दिवसांत 6,057 रुग्ण वाढले आहेत. तर 172 जणांचा मृत्यू झाला आहे. याचाच अर्थ मृतांची टक्केवारी वाढून 2.83 टक्के इतकी झाली आहे.