भवितव्याच्या नावाने काळाकुट्ट अंधार आणि अस्तित्वाच्या नावाने असंख्य प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर तरळत असताना पाच वर्षांपूर्वी शिरूर-हवेलीचे आमदार ऍड. अशोक पवार एकदा मला भेटण्यास आले. एका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगाराच्या मुलाच्या तब्येतीची विचारपूस करण्याइतपत एक साधारण सदिच्छा भेट होती; परंतु या भेटीने माझे आयुष्य 360 अंशात पलटून गेले. त्या भेटीत बापूंनी मला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सोशल मीडियासाठी काम करण्याचा कानमंत्र दिला. 2014 लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या दोन्ही निवडणुकांमध्ये मोदींना मिळालेल्या यशामध्ये सोशल मीडियाचा सिंहाचा वाटा होता.
2014मध्ये सोशल मीडियाचा अतिशय योग्य वापर हे मोदींच्या यशाचे प्रमुख कारण होते तर वेळीच सोशल मीडियाची ताकद न ओळखणे हे राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या अपयशाचे प्रमुख कारण होते. याचाच फटका शिरूर-हवेली मतदारसंघांमध्ये अशोकबापू पवार यांनाही बसला. 2009 ते 2014 या आमदारकीच्या काळामध्ये बापूंनी शिरूर-हवेली मतदारसंघांमध्ये राज्यातील सर्वाधिक निधी आणून मतदारसंघांमध्ये विकासाची गंगा प्रवाहित केली होती. अनेकानेक नवनवीन योजना व संकल्पना बापूंनी आमदार असताना प्रायोगिक तत्त्वावर आपल्या मतदारसंघात राबवल्या. नंतर त्या योजना महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यासाठी अंगीकारल्या. आमदारकीच्या काळात दळणवळणासाठी गावागावांना जोडणारे पक्के आणि दीर्घकाळ टिकणारे रस्ते बांधण्याकडे बापूंनी जास्त कल दिला.
याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आंधळगाव ते तांदळी हा काळ्या जमिनीच्या पट्ट्यातून जाणारा व सतत खचणारा रस्ता बापूंनी आपल्या पहिल्या आमदारकीच्या कार्यकाळात बांधला जो आजही अत्यंत सुस्थितीत आहे. शिरूर शहरातील रस्त्याकडील अतिक्रमणे हटवण्याच्या धाडसी निर्णयामुळे शहरातील मुख्य रस्त्याने बापूंमुळेच मोकळा श्वास घेतला. पुण्यातील सर्व सांडपाणी मुळा-मुठा नदीच्या माध्यमातून भीमा नदीच्या पात्रामध्ये मिसळते. त्यामुळे भीमा नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य पुणे शहराच्या प्रदूषित पाण्यामुळे धोक्यात आले होते.
बापूंनी याची दखल घेत या गंभीर समस्येला कारणीभूत असलेल्या पुणे महानगरपालिका विरुद्ध कठोर भूमिका घेऊन पुणे महानगरपालिकेला स्वखर्चाने भीमा नदीकाठच्या गावांना आरो प्लॅन्ट बसवण्यास भाग पाडले. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या चासकमान कालव्याच्या पाण्याचे आमदार अशोकबापूंनी 2009 ते 2014 या आपल्या कार्यकाळात पाण्याचे अतिशय सुयोग्य नियोजन केले. यामुळे आठमाही बागायतीचे बारमाही बागायती क्षेत्रामध्ये परिवर्तन झाले. यामुळे शिरूर तालुक्यातील चासकमान कालवा क्षेत्रातील शेतकरी खऱ्या अर्थाने सुजलाम-सुफलाम झाला.
2009 ते 2014 या कार्यकाळात हरियाणामध्ये गोरगरीब रुग्णांसाठी लागू असलेली राजीव गांधी जीवनदायी योजना महाराष्ट्र सुद्धा लागू करावी यासाठी आमदार अशोक बापू पवार यांनी सातत्याने तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी व आघाडी सरकारकडे पाठपुरावा करून योजना संपूर्ण राज्यामध्ये लागू केली. आज या योजनेंतर्गत (भाजपच्या नामांतरानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजना) महाराष्ट्रातील लाखो गरीब रूग्ण या योजनेचा लाभ घेत आपले करोडो रुपये वाचवत आहेत आणि याचे श्रेय नक्कीच आमदार अशोकबापू पवार यांना जाते. अशी अनेक छोटी-मोठी कामे करत बापूंनी शिरूर-हवेली मतदारसंघांमध्ये अक्षरश: विकासाचा महापूर प्रवाहित केला होता. तरीही दुर्दैवाने बापूंनी केलेली ही विकासकामे जनतेपर्यंत पोहचू शकली नाही. परिणामी बापूंना 2014 मध्ये पराभव स्वीकारावा लागला.
त्यामुळे बापूंनी सांगितल्यानंतर मीसुद्धा बापूंनी केलेली विकासकामे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्याचा निर्धार केला. त्यांनी सोशल मीडिया कार्यकर्त्यांची एक भक्कम फळी उभरण्यास प्राथमिकता दिली. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एक नवख्या कार्यकर्त्याला पक्षसंघटनेत सन्मानपूर्वक वागणूक व प्रदेश कार्यकारिणीत काम करण्याची संधी दिली. मी करत असलेल्या प्रत्येक कामासाठी बापूंनी मला नेहमी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच सोशल मीडियावर काम सुरू करतेवेळी 400 मित्र-मैत्रिणींचा असलेला संपर्क आज 4 लाखांवर पोहोचला आहे. अगदी बोटावर मोजण्याइतके कमी कमी होत चाललेले माझे अस्तित्व आणि ओळखीने बाप्पूंमुळे एक विस्तीर्ण रूप धारण केले आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लाखो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज माझ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संपर्कात आहे तसेच आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा, खासदार सुप्रियाताई, पार्थदादा पवार आणि रोहितदादा पवार या सर्वांनी माझ्या कामाची दखल घेत माझी प्रत्यक्ष भेट घेतली. माझ्या भवितव्याचा अंधकार आणि अस्तित्व पुढील सर्व प्रश्नचिन्ह आमदार अशोक बापू पवार यांच्यामुळेच पुसली गेली आहेत. मला खरच माहित नाही कितीजण समजून घेतील; परंतु माझ्या निरर्थक आयुष्याला अर्थ देऊन माझ्यामध्ये जगण्याची नवीन उमेद आमदार अशोकबापूंमुळेच निर्माण झाली. त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहील.
ज्यांच्या परिसस्पर्शाने माझे आयुष्य बदलले असे आदरणीय ऍड् अशोकबापू पवार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा! बाप्पू आपला लवकरच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश होवो, हीच या वाढदिवसानिमित्त सदिच्छा!
– सुदर्शन जगदाळे
सचिव- राष्ट्रवादी सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र
शब्दांकन : तेजस फडके, निमोणे, ता. शिरूर