वेगळी दिशा, वेगळा आचार, वेगळीच शैली अन् ध्येयवादी आचार… सहकारमहर्षी स्व. रावसाहेबदादा पवार यांच्या सेवेचा आणि विकासाचा वारसा पुढे चालविणारे नेतृत्व म्हणजे आमदार अशोकबापू पवार. शिरूर हवेलीच्या सामाजिक, कृषी, बांधकाम, रस्ते, वाहतूक, महसूल, आरोग्य, कला-क्रीडा तसेच शैक्षणिक मुख्य शिल्पकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
आमदार अशोकबापू यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला तर समाजकारण आणि राजकारण याचा गाढा अभ्यासक आणि विचारवंतांचे व बुद्धिवंतांचे आश्रयस्थान म्हणून समाजाने दखल घ्यावी, असे अष्टावधानी नेतृत्व, प्रदीर्घ राजकीय अनुभव, अविश्रांत मेहनत, गुणवत्तेची कदर आणि मोठ्यांचा आदर व लहानांची कदर जी जीवनमूल्ये अंगी बजाविणारा कणखर योद्धाच. सहकार, शिक्षण, क्रीडा, कृषी, अध्यात्म, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात चौफेर विहार करणारे सजग मान्यवर. विचारांतून विकासाकडे झेपावताना कालसुसंगत धोरणे ठरविणे, जनतेच्या आशा-आकांक्षा, अडचणी तसेच लोकशाही जीवनपद्धती समजून घेत समर्थ लोकनेते म्हणून अशोकबापूंचा आदराने उल्लेख करावा लागेल.
ज्यांच्या हाडामांसातच सेवा हा भाव आहे त्यांनी राष्ट्रीय नेते शरद पवारसाहेब, स्व. आर. आर. पाटील, नामदार अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे व समकालीन नेतृत्व यांचे वैचारिक अधिष्ठान आणि स्वराज्य व्यवस्थेचे जनसेवेचे प्रतिष्ठान निर्माण करत शिरूर हवेलीच्या विकासात आमदार अशोकबापू पवार यांनी प्रशंसनीय भर घातली आहे. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आणि शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात एकच धावपळ उडाली. नेहमीप्रमाणे प्रस्थापित भाजप आमदार विरुद्ध विकासाचा वटवृक्ष उभा केलेला; परंतु काही लाटेत तर काही दगाबाजीत थोड्या फरकाने पराभव पत्करावा लागलेले माजी आमदार अशोक पवार अशी सरळ लढत होणार हे स्पष्ट होत गेले. यातच काही पेल्यातली वादळे घोंगावली पण ती तेवढ्यापुरतीच!
पहिल्या दिवसापासून लोकांनी हातात घेतलेली ही निवडणूक, प्रचंड नियोजन, सक्षम प्रचार यंत्रणा, कार्यकर्त्यांचे अविश्रांत कष्ट अन् बापूंचा दांडगा जनसंपर्क यामुळे निवडणूक एकतर्फी होणार हे स्पष्ट होते, अन् झालेही तसेच. बापूंनी निवडणूक जवळपास 42 हजारांच्या फरकाने जिंकत षटकार मारला अन् शिरूर मतदारसंघात इतिहास घडविला. पुढे आदरणीय शरद पवारसाहेबांच्या चाणक्य नीतीने महाआघाडी सरकार स्थापन झाले. अर्थातच बापूंना सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी मिळणार, ही अपेक्षा संपूर्ण मतदारसंघातील सामान्य जनतेला होती; परंतु आघाडीच्या खेळात आधीच वाट्याला कमी आलेली मंत्रिपदे, त्यात पुणे जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नेते यामुळे बापूंनी मनाचा मोठेपणा दाखवीत आपली दावेदारी मागे घेऊन राजकीय प्रगल्भता दाखविली. पण यावेळेस ज्येष्ठांकडून मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाही, हा शब्दही बापूंनी मिळविला. गेल्या पाच वर्षांपासून फक्त आश्वासने, भूलथापा अन फेकाफेकीला कंटाळलेल्या शिरूर-हवेलीतील जनतेच्या डोळ्यांत खऱ्या विकासाचे, पवारसाहेबांच्या स्वप्नातील शिरूर-हवेलीचे स्वप्न तरळू लागले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनल्यानंतर पहिल्या दिवसापासून प्राधान्यक्रम ठरवून बापूंनी कामाचा सपाटा लावला. प्रशासनावरील पकड, नियोजन, कामाचा उरक अन् उपमुख्यमंत्री अजितदादांची साथ या चतुःसूत्रीचा पुरेपूर वापर करत अवघ्या काही महिन्यांतच लोकांना फरक दिसू लागला. पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक समस्या, वाघोली सारख्या नव्याने विकसित होत असलेल्या शहरात वाढत्या नागरिकीकरणामुळे निर्माण झालेले प्रश्न, चासकमान धरणाच्या पाण्याचे विस्कटलेले नियोजन, शिक्रापूर ते न्हावरे सारख्या प्रमुख रस्त्यांची झालेली दुर्दशा, सामान्य शेतकऱ्यांचे शासकीय पातळीवर प्रलंबित प्रश्न, पीएमआरडीएसारख्या संस्थांचा मनमानी कारभार अशा अनेक “आ’ वासून उभ्या असलेल्या समस्यांसमोर उभा ठाकला तो “एकच माणूस’ म्हणजे आमदार अशोकबापू पवार…
आव्हाने पेलण्याचे उपजत कौशल्य असणाऱ्या बापूंनी थोड्याच अवधीत हे प्रश्न हातावेगळे करण्यास सुरुवात केली. पुणे-नगर महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम चालू झाले. ओढे तुंबल्याने पावसाळ्यात महामार्गावर येणारे पाणी बंद करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या गेल्या. वाघोली गावाच्या पाण्याच्या व कचरा व्यवस्थापन करण्याच्या प्रकल्पावर अत्यंत गतीने काम चालू आहे. शिक्रापूर-न्हावरे मार्गाचे प्रशासकीय पातळीवरील सर्व समस्या दूर झाल्या असून पुढील काही दिवसात काम चालू होत आहे. चासकमान पाणी वाटपावर प्रायोगिक तत्त्वावर तीन आवर्तने झाली असून, त्यावर अभ्यास करून, आलेल्या समस्या समजावून घेत सतत सुधारणा केल्या जात आहेत. सध्याच्या करोना संकटाच्या अगोदर जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात बापू यशस्वी झाले आहेत.
इतकेच नव्हे तर पीएमआरडीए सारख्या संस्थांना मनमानी करण्यापासून रोखून भरघोस वित्तीय मदत मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. मार्च महिन्यापासून संपूर्ण जगातच करोनाने थैमान घातले आहे. अनेक नेते घरात बसून हे संकट दूर होण्याची वाट पाहत असताना अशोकबापू हे 24 तास मतदारसंघात फिरून प्रत्येक गोष्टीची तपशीलवार माहिती घेत योग्य त्या उपाययोजना सुचवत आहेत. आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, पोलीस यंत्रणा व प्रशासन यामध्ये व्यवस्थित ताळमेळ घालून बाधितांची तपासणी, औषधोपचार, संपर्क शोध इत्यादींवर बारकाईने नजर ठेवून असलेले आमदार अशोक पवार हे जनतेच्या पसंतीस उतरत आहेत, हे निश्चित!
कधीही भेटल्यावर आपल्या समस्या शांतपणे ऐकून घेऊन, त्याबद्दल सखोल चौकशी करून, 100 टक्के उपाययोजना करणारे नेतृत्व म्हणून कार्यकर्ते हक्काने बापूंना भेटतात. कोणासही केव्हाही भेटण्यास उपलब्ध ही बापूंची खासियत आहे. त्यांच्या या गुणांमुळे ते शिरूर-हवेलीच्या जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करीत आहेत. पवार साहेबांच्या दूरदृष्टीने या मतदारसंघात मोठी औद्योगिक वसाहत झालीय. मोठ्या प्रमाणात येथील अर्थव्यवस्था या औद्योगिकीकरणावर अवलंबून आहे; परंतु वाढता औद्योगिक दहशतवाद, गुंडगिरी अन् ठेकेदारांच्यामुळे ग्रहण लागलेल्या या विभागाला बापूच तारणहार ठरतील, असा विश्वास कामगार वर्गात निर्माण करण्यात बापू यशस्वी होत आहेत, यात शंकाच नाही.
छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांनी पवार साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणाऱ्या असंख्य हातांच्या मांदियाळीत बापू देखील आपला खारीचा वाटा उचलत आहेत. इतिहास घडविण्यास प्रचंड कष्ट घ्यावे लागतात, अनेक वैयक्तिक गोष्टींवर पाणी सोडावे लागते. विरोधकांच्या बरोबर स्वकियांचे घावदेखील सोसावे लागतात. हे सर्व यशस्वीपणे हाताळत मार्गक्रमण करणारे अशोकबापू नक्कीच इतिहास घडवत आहेत.
जनतेच्या सुखदुःखात सदैव सहभागी होणारा हा आधारवड आम्हांस प्रचंड ऊर्जेचा स्त्रोत आहे. व्यापक जन सामर्थ्यावर अश्वारूढ नेतृत्वास आमचा त्रिवार सलाम…
अध्ययन शील, प्रसन्नचित आणि विनयशील नेतृत्वाच्या कार्याचा आलेख असाच बहरत जावा ! आजच्या शुभप्रसंगी या अजातशत्रू नेतृत्वास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !
माननीय बापू.. यशवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तीवंत व्हा, आपल्या या कार्यास व वाढदिवसानिमित्त समस्त शिरूर-हवेलीतील जनतेकडून आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा..!
– मयूर करंजे पाटील
सरचिटणीस पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस
शब्दांकन : शेरखान शेख, शिक्रापूर