मुंबई : केंद्रातील मोदी सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशातील वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस सर्व वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपात 39 संघटना सहभागी झाल्या आहेत. वीज कर्मचारी संपावर गेले असतानाच उर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु आहे त्यांचा विचार करून संपकाऱ्यांना आपला संप मागे घ्यावा असे आवाहन राऊत यांनी केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी,”खासगीकरण कोणत्याही कंपनीचे होणार नाही, तसेच सरकारचा तसा अजिबात विचारही नाही अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. महावितरण आर्थिक संकटात असून कामगारांशी उद्या सकारात्मक चर्चा होऊन संप मागे घेतला जाईल. एक पाऊल सरकार मागे येईल, एक पाऊल कर्मचाऱ्यांनी मागे यावं, असं सांगत याविषयी तोडगा काढण्यासाठी उद्या संघटनांची बैठक देखील बोलावली आहे असे म्हणाले.
जवळपास 36 वीज कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चेत सहभागी झाले. त्यांना संप मागे घेण्याची विनंती केली. वीज कर्मचारी यांनी महाराष्ट्राला वेठीस धरू नये. सध्या उष्णता वाढली आहे, विजेची मागणी ही वाढलेली आहे, दहावी-बारावीची परीक्षाही सुरू आहे, शेतामध्ये व पीक असल्याने सिंचनाची गरज आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असताना वीज कर्मचाऱ्यांनी राज्याला वेठीस धरू नये आणि संप मागे घ्यावा अशी विनंती केली. उद्या समोरासमोर बसून मुंबईत चर्चा करू असेही त्यांना सांगितले आहे.
राज्यात दहावी, बारावीची परीक्षा सुरू असून संपकऱ्यांना याची आठवण असावी. असे सांगत उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान संप कायम राहिल्यास औष्णिक विद्युत प्रकल्पातील वीज निर्मितीवर परिणाम होणार असल्याचं राऊत म्हणाले. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, नितीन राऊत यांनी आवाहन केले आहे.
दरम्यान उद्या सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल. आणि भारनियमाने सारखी परिस्थिती राज्यावर येऊ देणार नाही असे आश्वासन वीज संघटनांनी दिले, ऊर्जा विभागाच्या अधिकाऱ्यांसह राज्याच्या प्रधान सचिवांनी ही वीज कर्मचाऱ्यांच्या संघटना सोबत चर्चा केली होती काही प्रमाणात गैरसमज आहे, मात्र उद्या चर्चेतून सर्वदूर होईल. असे राऊत म्हणाले.