सामाजिक भान..हा मुद्दा नेहमीच नकळत एक गोंधळात पाडणारी गोष्ट ठरतो. म्हणजे बघा…सोशल मीडिया आलं समाजातल्या सगळ्या गोष्टी चटकन समजायला लागल्या, ओळखीच्या लोकांचे ‘ग्रुप्स’ झाले, सगळेच एकमेकांशी संपर्कात आले, सहज समाजापर्यंत कुणालाही पोहोचणं शक्य झालं, कुठलीही अडचण असली की पटकन मोकळं व्हायला मार्ग मिळाला..पण ह्या “सोशल” म्हणजेच सामाजिक मीडिया मुळे आपलं सामाजिक भान नक्की वाढलं की कमी झालं?
आपल्याला आज अगदी देशविदेशातल्या कानाकोपऱ्यातल्या घडामोडी माहीत असतात..पण अगदी आपल्या शेजारच्या घरातली लोकं काय करतात..त्यांची सुखदुःखं तर सोडाच पण त्यांच्याशी तोंडओळख जरी असली तरी नशीब म्हणावं लागत! या इंटरनेटने आपल्याला मोकळं व्हायचे असंख्य पर्याय दिले पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला आपल्या घरात..फ्लॅट च्या दरवाज्यातच कोंडून ठेवलं. आपण आपल्या आसपास राहणारी माणसं आपला भाग..मग त्यात आपल्या ओळखीची किंवा अनोळखी असोत. पण आपण सगळे मिळून कळत नकळत एक समाज तयार करतो आणि अशाच असंख्य समाजांनी देश बनतो. त्यामुळे आपल्या सगळ्या समजघटकांच्या मनात एकमेकांविषयी आपलेपणा असणं आवश्यक असायला हवं!
माणूस हा सामाजिक प्राणी आहे म्हणूनच तो एवढी प्रगती करू शकला. जेव्हा आपल्याच आजूबाजूचा कुणीतरी पोट भरायच्या भीतीने शक्य तसा गावी पळत सुटतो..आणि अपघाताने जीव गमावतो. तेव्हा त्याच्यावर ही वेळ आल्यावर दार लावून बघत बसणाऱ्या समाजाचंच हसू येतं ! कारण संकट हे सगळ्यांवर आहे..आज त्याची वेळ होती..कदाचित उद्या तुमची असू शकते हेचं आपण विसरून जातो. माझी प्रतिकारशक्ती दणकट आहे..”मला काय त्याचे?” अश्या फुशारकीने बरेच शूर लोक मिरवतात..पण मी हा रोग अजून २०० लोकांना पसरवला..तर सगळा समाज उध्वस्त होईल हे त्यांचा डोक्यातच शिरत नाही! कारण समाज आहे म्हणून मी आहे हे भानच त्यांना राहिलेलं नाही. बरेच दानशूर अगदी पैश्याच्या थप्या ओततात..पण फक्त त्याने काम झालं असं होतं नाही..मानसिक भाग हा लढाईत जास्त महत्वाचा ठरतो. ह्या समाजाला जशी थप्प्यांची गरज असते तशीच आपापसातल्या प्रेमाच्या थापेची सुद्धा आहे ! जे आपल्या प्रत्येकाचं सामाजिक कर्तव्यच आहे. थप्या मिळाल्या आणि मिळतीलही पण थापेचं काय?
-निनाद कुलकर्णी,
कॉलेज रिपोर्टर,
आबासाहेब गरवारे महाविद्यालय