- दिघी दत्तगड ः पाण्यासाठी करणार तलाव निर्मिती
चऱ्होली – पुणे-आळंदी रोड येथील दत्तगड (दिघीचा डोंगर) या परिसरात दक्षिण कमानच्या 136 आर्मी बटालियनकडून सुमारे एक लाख वृक्षलागवड करण्याचे काम सुरू आहे. यापैकी दहा हजार झाडे ही “अविरत श्रमदान’ या पर्यावरण सेवाभावी संस्थेच्या वतीने लावण्याचे काम सध्या सुरू असून, या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी संस्थेने घेतली आहे.
एक लाख वृक्षलागवडीची मोहीम 30 ऑगस्टपासून सुरू आहे. सध्या दिघी, खडकी आणि खडकवासला या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत आहे. या वृक्षांना पाणी तिथेच मिळावे, यासाठी तलाव निर्माण केले जात आहेत. सुमारे 12 लाख लिटर वर्षाला पाणी साठेल अशी ही योजना आहे. तेच पाणी वर्षभर वृक्षांना देण्यात येणार आहे.
आतापर्यंत 16 हजार रोपे लावली आहेत. कर्नल पी. के. वेंकटेश यांच्या नेतृत्वाखाली आणि सामाजिक वनीकरणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून याकरिता पिंपरी-चिंचवड शहरातील “अविरत श्रमदान’ या संस्थेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.
ही पर्यावरण संवर्धन चळवळ व्यापक करण्याच्या दृष्टीने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील पर्यावरणप्रेमींना या पर्यावरण संवर्धन कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी संस्थेचे सुनिल कदम, जितेंद्र माळी, डॉ. नीलेश लोंढे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.