-डॉ. शैलेंद्र देवळाणकर
भारतीय लष्कराच्या तोफा, राफेल विमाने सज्ज आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत भारत- चीन यांच्यात संघर्ष होण्याची दाट शक्यता अधिक आहे. यासाठी भारताची सर्व दृष्टिकोनातून तयारी पूर्ण झालेली आहे.
पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर भारत आणि चीन यांचे सैन्य केवळ 300 मीटर अंतरावर समोरासमोर ठाकले आहे. 1962 नंतर असे पहिल्यांदाच घडते आहे. या भागात तापमान उणे 30 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेले आहे. पुढील दहा महिने चीनकडून केल्या जाणाऱ्या कोणत्याही कुरघोडीवर मात करायला भारतीय लष्कर सर्वच दृष्टिकोनातून तयार आहे. अत्यंत उंच पर्वतीय क्षेत्र असूनही पुढील दहा महिने पुरेल इतका अन्नधान्य पुरवठा लष्कराला पोहोचवण्यात आला आहे. त्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आलेली आहे.
अमेरिका आणि इस्रायलकडून लष्करासाठी उबदार कपडे, तापमान स्थिर ठेवणारे तंबू घेऊन ते ताबारेषेवर उभारण्यात आलेले आहेत. भारतीय लष्कराच्या तोफा, राफेल विमाने सज्ज आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांत भारत- चीन यांच्यात संघर्ष होण्याची दाट शक्यता अधिक आहे. यासाठी भारताची सर्व दृष्टिकोनातून तयारी पूर्ण झालेली आहे.
एलएसीवर तणावपूर्ण वातावरण असताना नियंत्रणरेषेवर (एलओसी) पाकिस्तानने रणगाडे तैनात केले आहेत. पाकिस्तानकडून यापूर्वी कधीही झाले नाही इतके शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. एलओसीवर पाकिस्तानने सैन्याची कुमक वाढवली आहे. भारत आणि चीन संघर्षाची ठिणगी पडल्यास पाकिस्तानकडून सेकंड फ्रंट खुली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते असे आजचे वातावरण आहे. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी 14 सप्टेंबर रोजी संसदेत हे स्पष्ट केले आहे की सीमेवर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे. चीन भारताला जाणीवपूर्वक चिथवण्याचा प्रयत्न करत आहे.
वास्तविक, चीनबरोबर लष्करी पातळीवरील चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत. आता सहाव्या फेरीची चर्चा करण्यास चीन तयार नाही. अलीकडेच भारत आणि चीन या दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री मॉस्कोमध्ये परस्परांना भेटले. त्यामध्ये चीनने पूर्व लडाखमधून पूर्णपणे माघार घेण्याचे मान्य केले असले तरीही प्रत्यक्ष सीमेवर मात्र तशा कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत. याचाच अर्थ त्या करारातून काहीही साध्य झालेले नाही. एकीकडे चीनचे परराष्ट्र मंत्रालय आम्हाला शांतता हवी आहे, भारताबरोबर कोणताही संघर्ष करायचा नाही आणि चर्चेने मार्ग काढायचा आहे, असे सांगत असताना दुसरीकडे एलएसीवर युद्धाची जय्यत तयारी केली गेली आहे. या विसंगतीची कारणे काय आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
चीनच्या या दुटप्पी धोरणाची दोन प्रमुख उद्दिष्टे दिसून येतात. पहिले उद्दिष्ट म्हणजे पूर्व लडाखमध्ये झालेल्या गलवान संघर्षाला 84 दिवस उलटून गेले आहेत. या 84 दिवसांमध्ये चीनचे किंवा राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचे घुसखोरी करून भारतावर दबाव आणण्याचे धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
गेल्या 84 दिवसांमध्ये ज्या ज्या वेळी चीनने कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी भारताकडून कणखर दणका देण्यात आला आहे. 1962च्या युद्धामध्ये चीनने काबीज केलेल्या काही पोस्टही आता भारताने परत मिळवल्या आहेत. विशेषतः चुछूल हे 1962च्या युद्धाचे केंद्र होते. या क्षेत्रातील ब्लॅक टॉप पोस्ट चीनच्या कब्जात होती. पण आता तेथे भारताचा तिरंगा फडकला आहे. या पोस्टवरील कब्जाने भारतीय सैनिक आता वरच्या स्थानावर आले आहेत.
पूर्व लडाखमध्ये हिवाळा सुरू झाला आहे. येणाऱ्या काळात हिवाळ्याची तीव्रता प्रचंड वाढत जाणार आहे. पूर्व लडाखमधील संघर्ष सतत सुरू ठेवणे हे जिनपिंग यांच्या राजकीय अस्तित्वासाठी गरजेचे बनले आहे. पण हे अवघड जागेचे दुखणे जिनपिंग यांना भारी पडणार असे दिसू लागले आहे. चीनच्या युद्धनीतीला “ऍग्रेसिव्ह डिफेन्स’ म्हणतात. यानुसार, शत्रूवर प्रचंड दबाव आणून त्याला मागे ढकला. शत्रूवर इतका दबाव टाका की अखेरीस संयम सुटून शत्रू आपल्यावर हल्ला करेल. याच रणनीतीनुसार सध्या जिनपिंग पावले टाकत आहेत.
भारताची परिस्थिती 1962 च्या तुलनेत खूपच सुधारलेली आहे. पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते निर्माण झाले आहेत. दहा महिनेच नव्हे तर दोन वर्षे युद्ध चालले तरी त्यासाठी आवश्यक अन्नधान्य, उबदार कपडे, शस्त्रास्त्रे, साहित्य आज भारताकडे आहे. एलएसीवर जिथे वीज नाही तिथे वीजनिर्मिती करता येणारी साधनेही आज उपलब्ध आहेत. थोडक्यात, भारत आता वर्चस्व गाजवण्याच्या स्थितीत आहे.
तैवानसारख्या देशाने चीनच्या डोळ्यात डोळे घालून चीनला उत्तरे देण्यास सुरुवात केली. तैवानचा आत्मविश्वास भारतामुळे वाढला आहे. आज चीनच्या लढाऊ विमानांचा पाठलाग तैवान करतो. मध्यंतरी चीनचे एक लढाऊ विमान पडले होते, त्याचे कारण कळलेले नाही. पण ते तैवानने पाडले असे म्हटले जाते. तैवानबरोबरच दक्षिण चीन समुद्रात व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांची हिंमतही वाढली आहे. कारण भारताने दिलेल्या दणक्यामुळे चीन माघार घेतो आहे, हे या देशांना कळून चुकले आहे.
अलीकडेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या यूएन कमिशन ऑन दी स्टेटस ऑफ वूमेन या अत्यंत महत्त्वाच्या आयोगाच्या सदस्यत्वासाठी भारत आणि चीन दोघांमध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत भारताने चीनचा दारुण पराभव केला. आजवर चीनला अशा पराभवाला कधीही तोंड द्यावे लागले नव्हते. कारण चीनकडे संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15 समित्यांचे अध्यक्षपद आहे. त्यामुळे या कमिशनचे सदस्यत्व मिळावे म्हणून चीनने मोठी मोर्चेबांधणी केली होती. पण ती व्यर्थ ठरली. याचा अर्थ असा की चीनची विश्वासार्हता ढासळते आहे.
चीन आता आम्ही शांततेने मार्ग काढणार आहोत आणि आम्हाला संघर्ष नको आहे, असे जागतिक समुदायाला भासवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण चीनची प्रतिमा ढासळते आहे. पण जमिनी संघर्षात चीनने माघार घेतली तर इतर लहान देशांबरोबर असणाऱ्या चीनच्या संघर्षावर परिणाम होणार आहेत. या देशांची हिंमत वाढून ते चीनसमोर नमते घेणार नाहीत. थोडक्यात, “म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावू नये’ अशी चीनची अवस्था झाली आहे. ही भीती असल्यानेच चीन आक्रमकपणाचे नाटक करत आहे.
कदाचित भारताबरोबर चीन एखादा छोटा संघर्षही करेल. यावेळी भारताचे हवाई दल पूर्णपणे सज्ज आहे. कारगील युद्धात हवाई दल उशिरा सहभागी झाले होते. त्यामुळे आपली जीवितहानी अधिक झाली होती. पण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असल्याने आता तिन्ही दलात समन्वय साधून झटपट निर्णय घेतले जाताहेत. त्यामुळे भारताची बाजू प्रचंड भक्कम आहे.