लोणी काळभोर -हवेली तालुक्यातील सर्वात मोठी व नावाजलेली लोणी काळभोर येथे ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा यंदा करोना साथीच्या पार्श्वभूमीवर शांत व नीरस वातावरणात पार पडली. चैत्र नवरात्रातील सर्व दिवस मंदिराला कुलूप लावण्यात आले होते. त्यामुळे भाविकांच्या अनुपस्थितीत पुजारी, मानकरी आदी मोजक्या लोकांच्या हस्ते धार्मिक विधी पार पडले.
लोणी काळभोर हे तालुक्याच्या पूर्व भागातील एक आर्थिकदृष्ट्या संपन्न गाव आहे. ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. कुस्त्यांचा आखाडाही प्रेक्षणीय असतो. विजेत्या मल्लांना एकूण पंचवीस लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जातात. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर काहीच कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते.
वार्षिक उत्सवानिमित्त गुढीपाडव्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरूवात होते. पुढील पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. ही यात्रा चैत्र पोर्णिमे (हनुमान जयंती)ला असते. यंदा ही यात्रा बुधवार दि. 8 व गुरूवार दि. 9 रोजी होती.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात होते. पाडव्याच्यादिवशी पहाटे पाच वाजता “श्रीं’ना महामस्तकाभिषेक करण्यात येतो. सायंकाळी सर्व भाविकांच्या उपस्थितीत अंबरनाथ व जोगेश्वरीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडतो. श्रीमंत अंबरनाथाच्या वार्षिक उत्सवानिमित्त चैत्र नवरात्रातील घटस्थापना दि.31 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता झाली होती.
पाचव्या माळेच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता पाचव्या माळेनिमित्त सुवासिनींनी घाणा भरणे व हळद फोडण्याचा कार्यक्रम होतो. सातव्या माळेच्या दिवशी सायंकाळी सात वाजता अंबरनाथ व जोगेश्वरीला हळद लावण्याचा कार्यक्रम होतो. हनुमान जयंतीच्या दिवशी अंबरनाथाची महापूजा पहाटे चार वाजता होते. पालखी सोहळा झाल्यानंतर छबिन्याचा कार्यक्रम रात्री दहा वाजता सुरू होतो.
दहाव्यादिवशी पहाटे चार वाजता अंबरनाथ व जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा होतो. दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात येतो. यंदा मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर एकही कार्यक्रम आयोजित केला नव्हता. देवस्थान समितीच्या वतीने ही कल्पना गावकऱ्यांना देण्यात आली होती.
त्यामुळे नवरात्रमधील नऊ दिवस व मुख्य यात्रेचे दोन दिवस एकही भाविक मंदिरात आला नाही. मंदिराच्या दोन्ही दरवाजांना कुलूप लावण्यात आले होते. त्यामुळे नैवेद्य दाखवण्यासाठीही कुणीही आले नाही.यात्रेसाठी नांदायला गेलेल्या माहेरवासिनी मुलांबाळांसह माहेरी रहाण्यासाठी येतात.
परिसरातील पाहुणे, राऊळे यांना शाकाहारी, मांसाहारी जेवणाचे आमंत्रण दिले जाते. एकंदरीत सर्वत्र आनंदी आनंद असतो. यंदा मात्र कोरोनामुळे गावची यात्रा रद्द झाली. फक्त सेवेकरी व मानकरी यांनीच धार्मिक विधी पार पाडले. त्यामुळे गावची यात्रा झाली, असे कुणालाही वाटले नाही.