परळी – गेल्या अनेक दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पक्षात घुसमट होत असून त्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु होत्या. पंकजा मुंडे या भाजपला रामराम ठोकून दुसऱ्या पक्षात जाण्याची चाचपणी करत असल्याचं देखील बोललं जात होत. मात्र आज सावरगाव येथे झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. यावेळी बोलताना मुंडे यांनी, २०२४ निवडणुकांमध्ये पक्षाने तिकीट दिल्यास निवडणुकीची तयारी सुरु करणार असल्याचं देखील म्हंटलं आहे. मुंडे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी विधानसभेचे आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
२०१९ विधानसभा निवडणुकांमध्ये परळी विधानसभेत भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे असा सामना रंगला होता. निवडणुकीच्या रणधुमाळीत नात्याने बहीण भाऊ असलेल्या पंकजा व धनंजय मुंडे यांनी एकमेकांवर टोकाची टीका केल्याचं पाहायला मिळालं होत. या निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे यांनी बाजी मारत पंकजा मुंडे यांच्या गडाला सुरुंग लावला होता. अशातच आता निवडणुकांना २ वर्ष अवधी असताना पंकजा यांनी निवडणुकांची तयारी सुरु करण्याबाबत भाष्य केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले धनंजय मुंडे…
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना धनंजय मुंडे यांनी, “प्रत्येकजण निवडणुकीची तयारी करत असतो. लोकशाहीत प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी पक्ष निवडणूक लढवण्याची संधी देतो, तेव्हा संबंधित व्यक्तीला त्या-त्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागते.” अशी प्रतिक्रिया दिली.
“निवडणूक हा लोकशाहीचा गाभा आहे. त्यामुळे कुणी कुठून निवडणूक लढवावी आणि कुठून निवडणूक लढवू नये, हा निर्णय ज्याचा त्याचा पक्ष ठरवेल. पक्षाने जबाबदारी दिल्यास निवडणूक लढवावीच लागेल. शेवटी निवडणूक कोण जिंकणार, हे मायबाप जनता ठरवेल.” असेही धनंजय मुंडे म्हणाले.