मुंबई – सध्या सगळीकडे रामायणावर आधारलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचीच चर्चा रंगली असल्याचं दिसून येत आहे. 16 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. भगवान श्रीराम यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारत आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन माता सीतेची भूमिका साकारत आहे.
‘आदिपुरुष’चं पाहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. टिझर नंतर झालेला वाद ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कमी झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ‘आदिपुरुष’ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कुठे प्रेक्षक चित्रपटावर टीका करत आहेत.
तर कुठे चित्रपटविरोधात नेटकरी देखील सोशल मीडियावर आक्रम झाल्याचं दिसून येत आहे. मात्र, सिनेरसिकांनी देखील ‘आदिपुरुष’कडे पाठ फिरवली असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सिनेमाच्या कमाईचा वेग मंदावला असल्याचं दिसत आहे.
‘आदिपुरुष’वरुन सुरु असलेल्या वादादरम्यान आता रामानंद सागर यांची ‘रामायण’ मालिका टिव्हीवर पुन्हा एकदा प्रसारीत करण्यात येणार आहे. अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांची ‘रामायण’ मालिका शेमारू टीव्हीवर पुन्हा प्रसारित करण्यात येणार आहे. ही मालिका 3 जुलैपासून संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे.
शेमारू टीव्हीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये लिहिलं आहे, “सर्व प्रिय दर्शकांसाठी, आम्ही जगप्रसिद्ध पौराणिक मालिका ‘रामायण’ घेऊन येत आहोत. ‘रामायण’ पहा 3 जुलैपासून संध्याकाळी 7.30 वाजता फक्त ShemarooTV वर.’ या आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.
दरम्यान, रामानंद सागर यांची ऐतिहासिक मालिका ‘रामायण’ 1987 मध्ये प्रसारित झाली होती. त्यावेळी ‘रामायण’ खूप लोकप्रिय झाले होते. ‘रामायण’ पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी होत होती. या मालिकेत अरुण गोविल यांनी भगवान रामाची भूमिका साकारली होती आणि दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकारली होती. आज देखील या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड आदर आणि प्रेम असल्याचं सतत दिसून येते.