ग्रामपंचायतीची पोलिसात तक्रार : बदनामी व गावात तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप
वाघोली- सोशल मीडियाचा महत्वपूर्ण भाग असलेल्या ट्विटरवर बोगस अकाउंटद्वारे आक्षेपार्ह पोस्ट व मजकूर टाकून वाघोली ग्रामपंचायतीची बदनामी केली जात असल्याचा आरोप करून वाघोलीचे सरपंच व कार्यकारणीने बोगस ट्वीटर अकाउंटविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. काही निवडक सोसायटीधारक बोगस अकाउंटद्वारे वाघोली गावाची बदनामी करून सोसायटीधारक व ग्रामस्थांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायत कार्यकारिणीने केला आहे.
ग्रामपंचायत कार्यकारिणीने दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, हद्दीमधील काही बेनामी बोगस ट्विटर अकाउंटवाले ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांची सोशल नेटवर्किंग साइटवर बदनामीकारक, असभ्य, अश्लील पोस्ट टाकून वाघोलीतील सूज्ञ नागरिकांची नाहक बदनामी करीत आहेत. महिला सरपंच व महिला सदस्यांबाबत अश्लील भाषा या पोस्टमध्ये वापरली जाते. खोटी दिशाभूल करणारी माहिती पोस्ट केली जाते. संपूर्ण वाघोली गावाची बदनामी होत असून मानहानी होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण होण्याऐवजी शत्रुत्व निर्माण होत आहे. वाघोली गावाचा फोटो व पवित्र वाघेश्वर देवस्थानाचा फोटो वापरल्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बोगस ट्विटर अकाउंटवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
- संघर्ष पेटण्याची शक्यता
वाघोली ग्रामपंचायतीविरोधात ऑनलाइन सुरू असलेली मोहीम वाघोली ग्रामपंचायत कार्यकारिणी व ग्रामस्थांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. काही मोजके सोसायटीधारक ऑनलाइन बदनामी करून वाघोलीला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने पत्रकार परिषदेत केला आहे. झालेल्या विकासकामांबाबत चर्चा केली जात नाही. मात्र, एअर कंडीशनमध्ये बसून ऑनलाइन याचिका व तक्रारी करण्यापेक्षा कार्यकारिणीसोबत काम करून समस्या सोडविण्यासाठी पुढे येणे गरजेचे असताना बदनामी करण्यात धन्यता मानत असल्याचे ग्रामपंचायत कार्यकारिणीने सांगितले. ज्या समस्या ग्रामपंचायतीच्या अखत्यारित नाहीत, त्याचे खापरही ग्रामपंचायतीवर ढकलले जाते. सर्वाधिक टॅक्स सोसायटीधारकांचाच थकीत आहे. सोसायटीचाच कचरा रस्त्यावर पडतो. सोसायटीधारक बिल्डरविरोधात बोलत नाहीत, सोसायटीतील कचरा व सांडपाणी प्रकल्प बंद आहेत. सोसायटीधारक केवळ सोशल मीडियावर चमकोगिरी करीत असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. एकंदरीत आगामी काळामध्ये सोसायटीधारक व ग्रामपंचायत, ग्रामस्थांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.