केडगाव -करोना विषाणूच्या महामारीतदेखील दौंड तालुक्यातील शेतकरी शेतीव्यवसायात गुंतला असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
करोना महामारीने जगात सर्वत्र थैमान घातले आहे. देशातही दररोज समोर येणारी आकडेवारी भीतीदायक दिसून येत आहे; परंतु दौंड तालुक्यातील शेतकरी या काळातदेखील शेती व्यवसायात गुंतला असल्याचे चित्र दिसत आहे. नवीन आडसाली ऊस लागण करण्यासाठी खरीप हंगामापूर्वीची कामे शेती मशागत कांदा काढणी इत्यादी कामे दररोज करताना शेतकरी दिसत आहेत.
करोना विषाणू आणि शासनाने केलेल्या लॉकडाऊनच्या काळातही शेतीतील कामे उरकून घेणे त्याच्यासाठी आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात शेती आणि त्याच्याशी संदर्भात असणाऱ्या व्यवसायाला शासनाच्या नियमावलीनुसार सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती.
यामध्ये शेतकरी व शेतमजूरांची कामे, शेती उत्पादन विषयक कामे, बाजार समित्यांची शेतीविषयक कामे, पीक पेरणी करणारी यंत्रे, कृषीविषयक अवजारे दुरुस्तीची कामे, कृषी सेवा पुरवणारी दुकाने, ठिबक व शेतीमालावर प्रक्रिया करणारे इतर उद्योग, वीजपंप दुरुस्ती करणारी छोटे व्यवसाय यापैकी काही व्यवसायातील शिथिलता हटवण्यात आली होती, परंतु त्याला पाहिजे तेवढा वेग मिळत असल्याचे दिसून येत नाही.
शेतीशी संबंधित असणारे बहुतांश उद्योग आणि व्यवसाय लॉकडाऊननंतर पुढील आदेशानुसार कार्यवाही सुरू होईल आणि शेतीची रखडलेली कामे मार्गी लागण्यास चांगली मदत होणार आहे. नागरिकांनी शेती आणि शेतीशी संबंधित असणारे व्यवसाय आणि उद्योग करताना स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. शेतीसाठी लागणारी औषधे, बियाणे, अवजारे, खते व डिझेल पेट्रोल मिळाल्यास शेतीकामे सुरळीत मार्गी लागतील.