रावणगाव -कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड येथे विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये, फळे भाजीपाला आदी शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक – जावक सुरू आहे; परंतु करोना आजारामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून धान्य व कडधान्याची आवक कमी झाली आहे. त्याचा धान्य बाजारावर 65 टक्के परिणाम झाला आहे.
फळे, भाजीपाला यांची आवक – जावक समाधानकारकपणे सुरू आहे. सध्या केडगाव येथील उपबाजार सुरू असून यवत व पाटस येथील उपबाजार करोनामुळे कामगार तसेच व्यापारी येत नसल्याने अन्न धान्याची आवक घटल्यामुळे मार्च महिन्यापासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 30 एप्रिल पर्यंत दौंड मुख्य बाजार सुरू होता. गेल्या आठवड्यात दौंड येथील राज्य राखीव दलाचे आठ जवानांना कोरोनाची लागण झाली असल्याने प्रांत अधिकाऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून दौंड मार्केट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे संपूर्ण मार्केट बंद करण्यात आले आहे.लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा धान्य व भाजीपाला आवक वाढून कामकाज सुरळीत होईल.
राज्यात सर्वप्रथम ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करून पारदर्शीपणे कारभार करणारी पुणे जिल्ह्यातील दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती अव्वल ठरली असून ई – नाम मध्ये द्वितीय स्थान मिळवले आहे. दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य बाजार दौंड येथे असून यवत, केडगाव व पाटस या ठिकाणी उपबाजार आहेत. दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व कामे ऑनलाईन पध्दतीने केली जातात. यामध्ये ऑनलाईन नोंदणी, मालाची प्रतवारी, मालाची लिलाव पद्धती, ऑनलाईन बोली पद्धती, शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंट त्यांच्या खात्यावर जावून त्यानंतर शेवटच्या टप्प्यात मालाची ऑनलाइन जावक होते. या सर्व ऑनलाईन बाबींचा विचार करून केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यात राज्यातील 30 बाजार समित्यांची निवड केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यामधील दौंड व शिरूर या दोन कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत.
करोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून धान्य व कडधान्याची आवक कमी झाली आहे. फळे, भाजीपाला यांची आवक – जावक समाधानकारकपणे सुरू आहे. सध्या केडगाव येथील उपबाजार सुरू असून यवत व पाटस येथील उपबाजार कोरोना आजारामुळे कामगार तसेच व्यापारी येत नसल्याने अन्न धान्याची आवक घटल्यामुळे उपबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा धान्य व भाजीपाला आवक वाढून कामकाज सुरळीत होईल.
– दिलीप हंडाळ,
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती दौंड.