गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी अथवा गणेशोत्सव म्हटले की दणदणाट आणि उच्छाद हे समीकरणच झाले आहे. पुणे असो वा मुंबई या शहरांमध्ये याबाबतीत प्रशासनानेही हात टेकले आहेत. नियमांचे उल्लंघन करून उत्सव साजरे करणे हा आता “शिष्टाचार’ होत चालला आहे, उत्सवाची “अनिष्ट परंपरा’ होत चालली आहे. समाज, कार्यकर्ते आणि राजकीय व्यवस्था यांमध्ये समन्वय नसले की काय होते, याचे एक उत्तम उदाहरण आहे.
यंदाचा दहीहंडी उत्सव झाला, त्याचवेळी पुढील काळात येणाऱ्या गणेशोत्सवात काय होणार याचा अंदाज आला होता. मात्र सरकारी आणि पोलीस यंत्रणांनी केवळ आवाहने करणे आणि आवाजाच्या नियंत्रणाबाबत बैठका घेऊन कारवाई करणार असे सांगत वेळ भागवून नेली. राजकीय नेत्यांनी मंडळांसह कार्यकर्त्यांवर असलेले आधीचे गुन्हे माफ करून सर्वच उन्मादाला खतपाणी घातले. दहीहंडी उत्सवातच त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन मिरवून घेतले आणि येणाऱ्या निवडणुकीच्या नांदीचे प्रदर्शनही केले.
पुण्यात दहीहंडीच्या दिवशी ध्वनिप्रदूषणाची धोकादायक पातळी सरासरी 106 डेसिबल होती, तसा अहवालही सणाच्या दुसऱ्या दिवशीच प्रसिद्ध झाला. मात्र, तरीही गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या गंभीर परिणामांचा विचार प्रशासनाने केला नाही. या दिवशी ध्वनिप्रदूषणाबरोबर लेझर दिव्यांचा वापरही अमाप केला गेला. स्थानिकांसह तेथून जाणाऱ्या नागरिकांना या सर्वच गोष्टींचा त्रास झाला. मात्र, समाजभान म्हणजे उत्सवातील कार्यकर्त्यांचे मन राखणे हीच मानसिकता प्रशासनाची असल्याचे दिसले.
गणेशोत्सव काळात दहा दिवस आणि नंतर विसर्जन काळातील दोन दिवस (यात केवळ 30 तास धरायचे नाहीत, तर विसर्जनाला मंडळाच्या स्थानापासून निघालेल्या मिरवणुकीचा होणारा दणदणाट म्हणजे ते आधीचे तासही लक्षात घ्यायचे आहेत. मिरवणूक रथ तयार करण्याआधीच डीजेच्या भिंती तयार करून त्याचे आवाज सुरू करायचे आणि नंतर रथाची सजावट करायची, ही कार्यकर्त्यांची पद्धत आहे) ज्या पद्धतीने डीजेचा दणदणाट झाला आणि सरासरी 129 डेसिबलच्या पुढे गेलेली ध्वनिप्रदूषणाची पातळी पाहता हा उत्सव नक्की कोणता आहे, हे सांगायची वेगळी गरज नाही.
भारतीय संस्कृतीचे जगापुढील चित्र
भारतीय संस्कृतीचा आणि उत्सवांचा अभ्यास करण्यासाठी अनेक परदेशी अभ्यासक येथे येत असतात. उत्सव पाहण्यासाठीही येथे येतात. मात्र, त्यांच्यासमोर किंवा बरोबर याच हिडीस वृत्तीचे प्रदर्शन होते आहे. देशभर आपण आपल्या संस्कृतीचे गोडवे गात आहोत. समाजभान आणि धार्मिकता यांचे एक चित्र जगासमोर आणण्याचा प्रयत्न सध्या चांगल्या पद्धतीने होत आहे. त्याला मान्यताही मिळत आहे. आपले सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी परदेशी नागरिक येत आहेत, त्याचे अनुकरण ते त्यांच्या देशात करीत आहेत. मात्र, त्यातील सोज्वळ भाव ते उचलत आहेत. आरती, मंगळागौरीची, कृष्णाची गाणी ते म्हणत आहेत. एकाही मंडळाच्या मिरवणुकीत गणपतीची स्तुती करणारे गाणे का होत नाही. महाराष्ट्राची संस्कृती दाखणारे खेळ आणि कला या मिरवणुकीत आणता येणे शक्य नाही का, जेणेकरून विदेशी आणि देशी अभ्यासकांना, पर्यटकांना त्याचा उपयोग होईल.
राजकीय पक्षांच्या हातात गेलेला उत्सव
दहीहंडी आणि गणेशोत्सव हे उत्सव राजकीय पक्षांच्या हातात गेले आहेत, हे उघड आहे. या दोन्ही उत्सवांआधी पदाधिकाऱ्यांच्या बैठका सर्व प्रशासनांतर्फे होतात. मंडळाचे पदाधिकारीही त्याला उपस्थित असतात. मात्र, यात सर्वाधिक संख्या ही राजकीय नेत्यांचीच असते. अर्थातच या विघातकतेला वळण लावणे हे या पदाधिकाऱ्यांना सहज शक्य आहे, पण त्यासाठी त्यांची मानसिकता महत्त्वाची आहे. अनेक ठिकाणी शिस्तबद्ध उत्सव आणि मिरवणुकीला बक्षिसे जाहीर केली जातात, त्यांचे निकष किती तंतोतंत पाळले जातात, हाही संशोधनाचा विषय आहे.
“रिल्स’चा काय उपयोग झाला?
गणेशोत्सव काळात कार्यकर्ता हा पंधरा दिवस या उत्सवासाठी झटत असतो. त्याचा प्रमुख आकर्षण हे विसर्जन मिरवणूक आहे, असा एक सूर नेहमीच ऐकू येतो. मात्र, जवळपास दहा ते बारा दिवस रोज सायंकाळी प्रमुख रस्ते बंद, कोणताही धार्मिक सोहळा नसलेल्या या उत्सवात आवाजाचा त्रास पुणेकर सहन करीत आहे. भावना प्रत्येकाच्या आहेत. यावर्षी अनेक “रिल्स’ या उत्सवाविरुद्ध माध्यमांवर फिरल्या. त्यात “बाबूराव…’, “कोंबडा…’, “शांताबाई…’ या देवापुढे वाजणाऱ्या गाण्यांवर आक्षेप घेतला गेला; परिणाम मात्र शून्यच दिसून आला.
पक्षी-प्राण्यांच्याही आरोग्यावर परिणाम
ध्वनिप्रदूषण पातळी ओलांडून वाजणाऱ्या साउंड सिस्टिमचा आणि लेझर दिव्यांचा परिणाम हा माणसांच्या आरोग्यावरच नाही तर तो पशू-पक्ष्यांच्या आरोग्यावरही झाला. मात्र, त्याची गणना होऊ शकली नाही. असे किती तरी प्राणी विशेषतः पक्षी या काळात गतप्राण झाले आहेत; फडके हौदाच्या चौकात एकाच वेळी तीन कबुतरं आणि दोन कावळे तिथे असलेल्या पिंपळाच्या झाडावरून पडून मेले, हे दिसत होते; पण त्याचवेळी मिरवणुकीतील एकाने या मृत पक्ष्यांना हातात घेऊन त्यांच्याबरोबरच नाचण्याचा प्रकार घडला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना होती.
मिरवणुकांमुळे आवाजात वाढ
105 डेसिबलपेक्षा अधिक आवाजाची नोंद झालेल्या ठिकाणी विसर्जन मिरवणुका आणि गणेशोत्सव मंडळाचे कार्यक्रम सुरू होते. गणपती विसर्जन मिरवणूक आणि गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये ढोल-ताशे, ड्रम, लाउड स्पीकर आदींचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने या आवाजाच्या पातळीमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण आवाज फाउंडेशनने नोंदवले.
डीजे साउंड सिस्टिमवर करोडो रुपयांची उलाढाल
अलीकडे उत्सव आणि डीजेचा आवाज ही समीकरणे रूढच झाली आहेत, आपल्याकडील अनेक उत्सवांमध्ये डीजेचा वापर सर्रास केला जातो आहे. मात्र, ही डीजे साउंड सिस्टिम विकत अथवा भाड्याने घेत असताना त्याची उलाढाल साउंड सिस्टिम विक्री बाजारात करोडो रुपयांची आहे. दगडूशेठ गणपती मंदिरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर ही बाजारपेठ पसरली आहे. पुणे शहराच्या मध्यवस्तीत निवासी झोनमध्ये ही बाजारपेठ आहे. आपल्याकडे रोजच काही ना काही उत्सव सुरू असतो. अशा वेळी या बाजारपेठेत साउंड सिस्टिम घ्यायला येणाऱ्यांसाठी टेस्टिंग, ती साउंड सिस्टिम तिथेच “असेंबल’ करणे, आवाजाची पातळी ओलांडून गेली तरी चालेल पर सिस्टिम विकली गेली पाहिजे यासाठी गिऱ्हाईकांना ती वाजवून दाखवणे, हा प्रकार वर्षभर सुरू असतो. येथील स्थानिक लोकांना त्याचा त्रास होतो, याबाबतीत आवाज उठवला तर दुकानदारांची आरेरावी सुरू होते.
मध्यवस्तीत विक्री
या साउंड सिस्टिम विक्रीसाठी कोणत्या नियमानुसार परवानगी दिली गेली, याचे उत्तर कोणाकडेही नाही. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीच्या नावाखाली या साउंड सिस्टिमची विक्री मध्यवस्तीत छोट्या रस्त्यांवरील दुकानांमधून होत आहे. रस्त्यावरच डेक विक्रीसाठी ठेवले जातात. तिथेच वाजवले जातात. तिथेच किमतीची तडजोड होते आणि काही हजारांत-लाखांत आकारमानानुसार त्याची विक्री होते. याच ठिकाणी रस्त्यावर छोटे स्टॉल हातगाड्यांवर लावून त्यांची दुरुस्तीही होत असते. या रस्त्याने चालत जाणेही दुरापास्त आहे, अशा ठिकाणी या उत्सव काळात आधी दोन दोन महिन्यांपासून वाहतूक कोंडी, आवाजाचे प्रदूषण आणि काही वेळा अगदी वादावादींपासून मारामाऱ्यांपर्यंत सगळे प्रकार येथील स्थानिकांना तीन माकडांची भूमिका घेऊन सहन करावे लागत आहे. विक्रीचा अधिकृत परवाना नसताना अगदी मध्यवस्तीत हा “साउंड सिस्टिम’चा बाजार मांडलेला आहे.
दोन वर्षांतील भयानक आकडेवारी
करोनानंतर गेल्या दोन वर्षांतील आवाजाची ओलांडलेली प्रदूषण पातळी ही धडकी भरणारी आहे. उत्सव याच पद्धतीने सुरू राहिला तर पुढील काळात त्याला आवर घालणे कठीण होणार आहे, याची आजच जाणीव होऊन यावरील निर्बंध हे कठोरपणे राबवणे गरजेचे आहे. शारीरिक, मानसिक त्रास, आर्थिक नुकसान आणि काही वेळा जिवावर बेतणाऱ्या उत्सवातील या विघातक गोष्टींचा विचार राज्यकर्त्यांनीही गंभीरपणे करून त्वरित पावले उचलणे गरजेचे आहे. गणेशोत्सव झाला की या विषयाला तोंड फुटते, त्यानंतर काही काळ गेला ही राळ खाली बसते. सामाजिक, राजकीय कार्यकर्तेही त्यानंतर थंड होतात आणि पुन्हा पुढच्या वर्षी याच विषयावर कोणत्याही विधायक निर्णयाविना चर्चा, अशीच ही उत्सवाची तऱ्हा आहे.
– मिलन म्हेत्रे