हल्ली झटपटच्या जमान्यात आपण आपले खरे अस्तित्व तर गमावून बसत नाही ना? या झटपटच्या भुलभुलैयात आपण आपल्या यशाची पायाभरणी कशी करावी याविषयी थोडेसे…
आपण सर्वच जण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. असा प्रयत्न करणे अगदी योग्यच आहे. आपण कामाची गती वाढविलीच पाहिजे. गती वाढविण्यासाठी आपण यंत्राची मदत घेतलीच पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात केलेच पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाने, नवीन अत्याधुनिक यंत्र सामग्रीने आपण कमी वेळेत दर्जेदार व जास्त काम करू शकतो. पण येथे एक लक्षात घ्यावे की काम पूर्ण करण्यासाठी काहीतरी वेळ हा द्यावाच लागणार आहे. बऱ्याच प्रसंगी आपण नेमकी येथेच गफलत करून बसतो. आपण झटपट काम उरकण्याच्या प्रयत्नात दर्जा घालवून बसतो आणि काम बिघडवून बसतो.
जेव्हा हाती घेतलेले काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख जवळ येते त्यावेळी आपल्याला कामाची जाग येते आणि आपण काम कसेतरी घाईघाईने पूर्ण करून सादर करून मोकळे होतो. हे वेळेचे गणित आपणच बिघडवून टाकलेले असते. आपणच सुरुवातीचा हाती असलेला वेळ वाया घालवून बसलेलो असतो. त्यामुळे जसजसा वेळ हातात कमी राहतो आणि काम जास्त शिल्लक राहते त्यावेळी आपल्या मनात विचार येतातच की, काम वेळेत पूर्ण करणे हे महत्त्वाचे आहे मग कामाचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक असणारा वेळ व घ्यावी लावणारी मेहनत यासाठी आता वेळ नाही.
नेमके हेच आपल्याला टाळायचे आहे. याशिवाय आपण स्वतःलाच काही प्रश्न विचारावयाचा आहे तो म्हणजे, जर काम उशिरा सुरू केले, तर कमी श्रम लागणार आहे का? कमी त्रास होणार आहे का? कामाचा दर्जा उंचावणार आहे का? काम आपोआप पूर्ण होणार आहे का? कमी कष्टात काम पूर्ण होणार आहे का? हे व इतर आणखी प्रश्न स्वतःलाच विचारून जर समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर आपण आपले काम वेळेत सुरु करायलाच पाहिजे. थोडक्यात, आपल्याला तहान लागल्यावर विहीर खोदावयाची नाही.
आपल्या मनात जेव्हा विचार येतो की, अजून भरपूर वेळ आहे, त्यामुळे आता लगेच कशाला कामाला सुरुवात करावयाची? हाच विचार चुकीचा आहे. आपण पहिल्या क्षणापासूनच जर कामाच्या व्याप्तीचे व वेळेचे भान राखत काम उरकत गेलो तर वेळेत आणि
दर्जेदार काम आपण सादर करू शकतो. आपण काम करत असताना त्या कामासाठी लागणारा आवश्यक तो वेळ हा दिलाच पाहिजे. तो वेळ आपण कमी करू शकत नाही. म्हणून आपण कामाचे व वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. अक्रोडाचे झाड बी रुजल्यापासून सुमारे 10 वर्षांनी अक्रोडाची फळे देऊ लागते. निसर्गाने निश्चित केलेला हा कालावधी आपण कमी करू शकत नाही. लक्ष्य साध्य करण्यासाठी कुठलाही जवळचा रस्ता वापरण्याच्या प्रयत्नात आपण धोका तर पत्करत नाही ना? याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला एखादे काम ठराविक वेळेत पूर्ण करावयाचे आहे, अशा वेळी आपण वेळेचे व कामाचे नियोजन करून दर्जा राखावयाचा आहे.
आपण जेव्हा आपले काम करून घेण्यासाठी इतर क्षेत्रांतील व्यक्तींवर जबाबदारी सोपवितो तेव्हा त्यांनाही काम करण्यासाठी योग्य वेळ दिलाच पाहिजे. आपण अशा काम करणाऱ्या व्यक्तींना काम करण्यासाठी कमी वेळ दिला तर तेही काहीतरी नगाला नग आपल्याला उभा करून देतील. यामुळे त्यांनी केलेले काम हे आवश्यक त्या दर्जाचे होईलच असे नाही. एखादे मोठे काम पूर्ण करण्याचे नेतृत्व जर आपण करत असू, जसे चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन जर आपणच करत असू तर आपल्या हाती सर्व सूत्रे असतात ही आपली जमेची बाजू असते. म्हणजेच कोणत्या क्षेत्रातील काम पूर्ण करण्यासाठी कोणाला निवडावे असे अनेक निर्णय आपण घेऊ शकतो. काम सुरू करण्यासाठी आपण इतर कोणाच्या आदेशाची वाट बघण्याची आवश्यकता नाही. यामुळेच आपण आपल्या मनाप्रमाणे काम व्यवस्थित पूर्ण करू शकतो व कामाचा दर्जा राखू शकतो.
आपल्या कामाची एक बाजू अशीही असते की निर्णय घेणे, आदेश देणे किंवा कामाचा आदेश मिळविणे हे आपल्या हाती नसते. बऱ्याच प्रसंगी असेही अनुभवास येते की, वरिष्ठांकडून किंवा ग्राहकाकडून आपल्या आपल्या कामाविषयी निर्णय, आदेश मिळण्यासाठीच खूप वेळ लागलेला असतो. जेवढा वेळ आपण आपले काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असतो त्याहीपेक्षा जास्त वेळ हा निर्णय अथवा आदेश मिळविण्यासाठी लागलेला असतो. अशी परिस्थिती हाताळण्यासाठी आपण आपली पूर्व तयारी ही अधिक चांगली करून ठेवायची. एखाद्या उपहार गृहामध्ये गेल्यावर जी पाककृती आपण मागवू ती तयार करण्याची पूर्व तयारी आधीच करून ठेवलेली असते. अशा प्रत्येक पाककृतीची पूर्व तयारी ही उपहारगृहाच्या व्यवस्थापनाने केलेली असते. जेव्हा आपण काही पाककृतीची मागणी करू त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच आपल्या पुढ्यात ती असते. आपणही आपल्या कामाचे असेच नियोजन, पूर्वतयारी करून ठेवायची. आपल्या अशा तयारीनेच आपण वेळेचे गणित साधू शकतो आणि कामाचा दर्जाही राखू शकतो.
भुसभुशीत जमिनीवर उंच इमारत उभी राहू शकत नाही, कुचकामी, तकलादू आधारावर आपण आपल्या यशाची इमारत उभी करू शकत नाही. उंच इमारत उभी करावयाची असेल तर जमीन चांगली आवश्यक आहे आणि त्या इमारतीसाठी आवश्यक ती सामग्रीही मजबूत आवश्यक असते, पायाही कच्चा ठेवून चालत नाही. नाहीतर इमारत उभीच राहू शकणार नाही, जर कशीबशी उभी राहिली तर कोणत्याही क्षणाला ती जमिनदोस्त होऊ शकते. मग जे काही परिश्रम ती इमारत उभी करायला लागले, जो काही पैसा खर्च झाला तो सर्व मातीत मिसळून जाऊ शकतो. पण हेच जर इमारत उभी करताना दर्जेदार साम्रगी वापरली आणि मजबूत पायाभरणी केली तर पुढची अनेक वर्षे ती इमारत दिमाखात उभी राहील. काम पूर्ण करण्यासाठी जो काही दर्जा राखणे आवश्यक आहे, त्यामध्ये तडजोड न करता आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून मनोदेवतेला जर आपल्या प्रयत्नांचे, नियोजनाचे आणि जे आवश्यक आहे त्या सर्वांचे पुष्प जर अर्पण केले तर मिळणारे यश असे असेल की जे कोणीच आपल्याकडून हिरावून घेऊ शकणार नाही.
अनिकेत भालेराव