अकोले – अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे सहलीसाठी आलेल्या औरंगाबादेतील तीन वकिलांची कार ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने दोघांना जलसमाधी मिळाली असून एकाने प्रसंगावधान राखून कारमधून उडी घेतल्याने तो वाचला. अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी रस्त्यावरील वारंघुशी ते पेंडशेत दरम्यान शुक्रवारी रात्री 8.30 वाजता ही घटना घडली.
घटनास्थळ दुर्गम असल्याने राजूर पोलिसांना तेथे पोहोचण्यास रात्री 11 वाजले होते. ऍड. आशिष प्रभाकर पालोदकर (34, रा. पालोद, ता. सिल्लोड), रमाकांत प्रभाकर देशमुख (34, रा. ताडपिंपळगाव, ता. कन्नड) अशी मृतांची नावे आहेत तर ऍड. अनंता रामराव मगर (रा. शिंगी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली) हे यातून बचावले. ऍड. आशिष पालोदकर हे औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कॉंग्रेस नेते प्रभाकर पालोकदर यांचे धाकटे चिरंजीव होत. राजूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील तीन पर्यटक भंडारदरा येथे कारने शुक्रवारी गेले होते. रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ते वारंघुशी ते पेंडशेत जात असताना रस्त्यावर पावसाचे पाणी साचलेले होते.
पुढे ओढ्याला पूर आलेला होता. हा ओढा कारमधील या तिघांना दिसला नाही. त्यांनी कार पाण्यात घातली व पुराच्या लोंढ्यात ते वाहून जाऊ लागले. प्रसंगावधान राखून ऍड. अनंता यांनी कारमधून उडी घेतल्याने ते वाचले, तर ऍड. आशिष आणि रमाकांत हे कारसह वाहून गेले. याच वेळी तेथून आणखी एक जण वाहून गेल्याचे समोर आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळावरून काही अंतरावरच आशिष आणि रमाकांत यांचे मृतदेह पोलिसांना सापडले. हे मृतदेह पोलिसांनी राजूरच्या शासकीय रुग्णालयात हलविले. आधार कार्डमुळे पटली ओळख पोलिसांना तेथे दोन मृतदेह आढळले होते. ऍड. अनंता हे मृत्यूच्या दाढेतून परत आल्याने ते प्रचंड घाबरले होते. त्यांना मृतांची नावेही सांगता येत नव्हती. पोलिसांना मृतांच्या पॅंटच्या खिशातील पाकिटात त्यांचे आधार कार्ड आढळले. या आधार कार्डांमुळे दोघांची ओळख पटविण्यात यश आल्याचे राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितले. राजूर पोलिसांनी जेसीबी, ट्रॅक्टरने ही कार ओढून बाहेर काढली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. कारमधील ऍड. आशिष आणि रमाकांतचे निधन झाले होते.