व्ही. के. कौर
यंदाच्या हिवाळ्यात पर्यटकांची पावले पुन्हा एकदा काश्मीरकडे वळली आहेत. त्यामुळे नंदनवनात पुन्हा बहार आली आहे.
काश्मीरमध्ये थंडीने तीस वर्षांचा उच्चांक मोडला आहे. चोहीकडे बर्फच बर्फ दिसत आहे. पर्यटकांची पावले काश्मीरकडे वळली आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत ज्या काश्मीरमध्ये हिंसा आणि दहशतीचे वातावरण होते, तिथे आता शांतता आहे. दहशतवादी संघटना आणि फुटीरवाद्यांना कदाचित हे वातावरण पसंत पडले नसेल; परंतु काश्मीर बदलले आहे हीच वस्तुस्थिती आहे. थंडीच्या दिवसांत काश्मीरमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
याच हंगामात काश्मीरमधील संस्कृती आणि परंपरांच्या रंगछटाही दिसून येतात आणि त्या पाहण्यासाठी काश्मीरमधील प्रमुख पर्यटनस्थळे हाउसफुल झाली आहेत. गुलमर्गचे प्रसिद्ध विन्टर रिसॉर्ट आणि हॉटेल गर्दीने भरून गेली आहेत. पर्यटक स्कीइंग आणि अन्य विंटर स्पोर्टसचा आनंद घेत आहेत. एवढेच नव्हे तर बॉलीवूडचे काश्मीरकडे आकर्षण वाढले आहे.
काही दशकांपूर्वी चित्रीकरणासाठी काश्मीर हा स्वित्झर्लंडला पर्याय मानला जात असे. तोच काळ आता पुन्हा परत आला आहे. बदलत्या वातावरणात काश्मीरमध्ये प्रत्येकाला रोजगार मिळत आहे. हे सर्वकाही रातोरात झाले असे नाही. यासाठी स्थानिक लोकांचा सकारात्मक विचार, हिंमत आणि सुरक्षा दलांचे सहकार्य हे घटक महत्त्वाचे ठरले आहेत.
2017 मध्ये पोलिसांची “मॅरॅथॉन रन फॉर पीस इन काश्मीर’ हा शांतता प्रस्थापित करण्याचा महत्त्वाचा प्रयत्न होता. या मॅरॅथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने युवकांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच हातात दगड घेऊन रस्त्यांवरून फिरणाऱ्या युवकांचाही त्यात समावेश होता. लहान-लहान मुलेही धावण्यासाठी आली होती. मॅरॅथॉनमध्ये भाग घेणाऱ्यांना उत्साहित करण्यासाठी स्थानिक नागरिकसुद्धा मोठ्या संख्येने दल सरोवराच्या काठावर जमले होते.
वातावरणात कुठेच दहशत जाणवत नव्हती. युवकांना काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, असे मनापासून वाटत होते. याचे एक कारण तेथील स्थानिक नागरिकांचे सुरक्षा दलांच्या सोबत चांगले संबंध प्रस्थापित होणे हे आहे. जेव्हा तेथील दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी “ऑपरेशन ऑल आउट’ सुरू केले तेव्हा काही संघटनांनी त्याला विरोध केला होता. परंतु आपले चांगले भविष्य कशात आहे, हे लवकरच तेथील युवकांच्या लक्षात आले. शांततेचे शत्रू अधूनमधून विघ्ने आणत असतात हे खरे; परंतु त्यांचे मनसुबे कधीच सफल होणार नाहीत.
सध्या बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक चित्रपट निर्माते काश्मीर खोऱ्यामध्ये ठिकठिकाणी आपल्या चित्रपटांसाठी चांगल्या लोकेशनचा शोध घेत आहेत. बॉलीवूडचा एक गटही काश्मीरमध्ये आला आहे. त्यात अजय देवगण फिल्म्स, संजय दत्त प्रॉडक्शन, रिलायन्स एन्टरटेन्मेन्ट, रोहित शेट्टी फिल्म्स, झी स्टुडिओज, अधिकारी ब्रदर्स अँड एसएबी (मराठी), अँडमोल, राजकुमार हिरानी, एक्सेल एन्टरटेन्मेन्ट या निर्मितीगृहांसह मुंबईच्या प्रॉड्यूसर्स गिल्डचे काही प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. काही चित्रपटांचे चित्रीकरण सुरूही झाले आहे. काश्मीरमध्ये बॉलीवूडच्या पुनरागमनाचे श्रेय स्थानिक नागरिक सुरक्षित वातावरणाबरोबरच सरकारकडून केल्या जात असलेल्या काश्मीरच्या “ब्रॅंडिंग’लाही देतात. याचे आणखी एक कारण असेही आहे की, करोनाच्या भीतीमुळे निर्माते परदेशांत चित्रीकरण करण्यास सध्या तरी धजावत नाहीत.
स्वित्झर्लंड, प्राग यांसारख्या देशांमध्ये जे वातावरण त्यांना चित्रीकरणासाठी मिळते, तसेच ते त्यांना काश्मीरमध्येही मिळते. 2015 मध्ये सलमान खानने बजरंगी भाईजान या चित्रपटाचे चित्रीकरण येथे सुरू केले होते तेव्हा हजारो लोकांना रोजगार मिळाला होता. हॉटेल कर्मचारी, वाहनचालक, घोडेवाले, दुकानदार, हस्तशिल्प विकणारे या सर्वांना काम मिळाले होते. मोठ्या संख्येने स्थानिकांना चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका मिळाल्या होत्या.
सलमान खान काश्मीरमध्ये चित्रीकरण करीत आहे ही बातमी पसरल्यानंतर असंख्य पर्यटक काश्मीरकडे आकृष्ट झाले होते, असे खुद्द स्थानिकच सांगतात. संपूर्ण गुलमर्ग आणि पहलगाम परिसर तीन महिने हाउसफुल होता. विकासाचा फॉर्म्युला काश्मीरच्या लोकांना आता कळून चुकला आहे, हे उघड आहे. आपले हात बंदूक उचलण्यासाठी नसून कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी आहेत, हे तेथील युवकालाही समजून चुकले आहे.
काश्मीर खोऱ्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी तसेच स्थानिक युवकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणूनच आज काश्मीर खोऱ्यातील तरुण आपली स्वप्ने पूर्ण करून देशाच्या प्रगतीला हातभार लावत आहे. तेथील युवक आता प्रशासनात येऊ लागले आहेत. “सुपर 30’च्या धर्तीवर लष्कर आणि एका स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने “काश्मीर सुपर 50′ प्रकल्प चालविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत काश्मीरमधील 50 विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचे निःशुल्क प्रशिक्षण दिले जाते.
काश्मीरमधील लोक मुळातच शांतताप्रिय आहेत. काळाबरोबर बाहेरच्या शासकांनी आपल्या फायद्यासाठी येथे द्वेष आणि हिंसेचे विष पेरले. कश्यप ऋषींवरून काश्मीर हे नाव पडले असे म्हणतात. काश्मीरचे बहुतांश मूळ निवासी एकेकाळी हिंदू होते.
ही संस्कृती 6000 वर्षांपूर्वीची आहे. 14 व्या शतकात तुर्कस्तानमधून आलेल्या दुलुचा या क्रूर मंगोल सुलतानाने काश्मीरवर हल्ला केला आणि साम्राज्याची स्थापना केली. जम्मू, काश्मीर आणि लडाख हे प्रदेश पूर्वी हिंदू शासकांच्या आणि नंतर सुलतानांच्या अधिपत्याखाली राहिले. नंतर अकबराच्या कार्यकाळात हे प्रदेश मुघल साम्राज्याचा भाग बनले. 1756 पासून अफगाणी शासकांच्या अधिपत्याखाली असणारे हे राज्य 1846 मध्ये पंजाबातील शीख साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. 1846 मध्ये रणजीत सिंह यांनी जम्मू क्षेत्र महाराजा गुलाबसिंह यांच्याकडे सोपविले. त्यानंतरही अनेक चढउतार या प्रदेशाने पाहिले.
35-अ कलम रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये जमिनीशी निगडित कमीत कमी सात कायद्यांमध्ये बदल करण्यात आला. जम्हूरियत, कश्मीरियत आणि इन्सानियत या त्रिसूत्रीनुसारच जम्मू-काश्मीरचा विकास होईल यात शंकाच नाही. हे वातावरण स्थानिक नागरिक आता खुलेपणाने अनुभवू लागले आहेत.