विठ्ठल वळसेपाटील
ग्रामसंस्कृती टिकवण्यासाठी न्यायालयीन संघर्ष करून सर्जा-राजाची जोडी न्यायालयात जिंकली. एक दशकाचा काळ लोटला तरी बैलगाडा शौकिनांचा बैल व शर्यतीविषयी उत्साह कणभरही कमी झाला नाही. बैलगाडा मालकांची बाजू न्यायालयाने ऐकली. यात खिलार जातीचे बैल हे शर्यतीसाठी उपयुक्त असल्याचा युक्तिवाद सादर केला व ही जात नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास आणून दिले.
त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीस सशर्त परवानगी दिली. त्यानंतर गावोगाव गुलाल, भंडाराने ग्रामदैवत न्हाऊन निघाले. यात विशेष म्हणजे इतके अडथळे येत असताना शेतकऱ्यांनी बैल विकले नाहीत तर त्यांना चांगल्या प्रमाणात सांभाळले. त्यांची उत्तम जोपासना केली. आता ही शर्यत सुरू होताच श्रेय घेण्यावरून राजकारणाचासुद्धा धुराळा उडत आहे.
ट्रॅक्टरच्या साह्याने यांत्रिकीकरण सुरू झाल्यामुळे शेतीसाठी व दळणवळणासाठी बैलांची संख्या कमी होऊ लागली. मात्र, ग्रामीण सांस्कृतिक जोपासना म्हणून शर्यतीचे बैल आजही टिकून आहेत. अन्यथा प्राणी संग्रहालयात बैल पाहावा लागला असता. पन्नास हजार रुपयांपासून चार लाख रुपयांपर्यंत बैलांच्या किमती आहेत.
त्यांच्या निवाऱ्याची व खुराकाची उत्तम सोय केली जाते. बैलगाडा मालकांची बैलगाडा विमा योजनासुद्धा अस्तित्वात आहे. त्यांची पशुवैद्यांकडून वारंवार तपासणी केली जाते. त्यांना सजावटीचे साहित्य घालून शोभिवंत केले जाते. बैल जेवढ्या जास्त शर्यती जिंकतो तेवढी त्याची किंमत वाढत जाते. शर्यतबंदीमुळे बैल दावणीला बांधून होते.
बैलगाडा व बैलगाडी शर्यत असे दोन प्रकार आहेत. प्राण्यांची पूजा करणे, मिरवणूक काढणे ही परंपरा आहे. पुढे बैलगाडी व बैलगाडा शर्यत ग्रामउत्सवातून पुढे आली व ती जपली गेली. यात चपळ म्हणून म्हैसूर व खिलार, पंढरपुरी खिलार, म्हसवड खिलार, आटपाडी खिलार बैलांची निवड केली जाते. बैलगाडा शर्यतीसाठी घाट अर्थात धावपट्टी यावर चार बैल गाड्याला जुंपून तीनशे ते चारशे फूट चढ्या धावपट्टीवर स्वार न बसता सोडले जातात व कमी सेकंदात मोजमाप करून 50 हजार ते तीन-चार लाख रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाते.
यात कोणताच जुगार अथवा सट्टा लावला जात नाही. बैलगाडी अथवा छकडी शर्यतीमध्ये दोन बैल जुंपून त्यावर एक स्वार बसून सपाटीने एक ते दोन किलोमीटर किंवा त्यापेक्षाही मोठी दौड केली जाते. प्रथम आलेल्यांची पुन्हा अंतिम फेरी घेतली जाते. येथेसुद्धा बक्षीस व वस्तूंची खैरात केली जाते. शर्यती समाप्तीनंतर ग्रामदैवताचा व खंडोबाचा जयजयकार करत मिरवणूक काढली जाते व मालकांचा गावप्रमुखांच्या हस्ते सन्मान केला जातो. असा एक देदीप्यमान सोहळा असतो. शर्यत करून घरी आलेल्या बैलांना ओवाळून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना केली जाते.