विजय शेंडगे
14 डिसेंबर 2021 रोजी श्रीमद्भगवतगीता हा ग्रंथ प्रकाशित झाला. साक्षात् परमेश्वर सांगणार, कुंतीपुत्र धनुर्धारी अर्जुन श्रवण करणार आणि महर्षी व्यास लिहिणार, असे असताना मी पामराने त्या ग्रंथाचे समीक्षण काय करावे? ज्येष्ठ चित्रकार आणि सुलेखनकार सुबोध केशव गोखले यांच्या हस्तलिखितातून हा ग्रंथ साकार झाला आहे.
तो ग्रंथ हातात घेऊन बघताना, त्याची पाने चाळताना केवळ अचंबित होणेच आपल्या हाती उरते. हस्तलिखित इतके बिनचूक असू शकते, इतके वळणदार असू शकते, त्यातील अक्षरात इतका एकसारखेपणा असू शकतो हे केवळ अविश्वसनीय वाटते.
संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात असलेला हा 18 अध्यायांचा 700 श्लोकांचा ग्रंथ सुबोध गोखले यांनी बिनचूक लिहिला आहे. प्रथमदर्शनी हे काम अतिशय सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात त्यातील किचकटपणा ग्रंथ बघताना लक्षात येतो. अतिशय क्लिष्ट अशी जोडाक्षरे लिहिताना चूक होऊ न देणे हे सोपे काम नाही. त्यातून चूक झालीच खाडाखोड करण्यास वाव नाही.
लिहिलेले पान पुन्हा पहिल्यापासून लिहिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. असे असतानाही सुबोध गोखले यांनी हे काम अत्यंत एकाग्रतेने पूर्ण केले आहे. विश्वास भागवत यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
श्रीमद्भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायातील अठराव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण सांगतात -समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः । शीतोष्णसुखदुःखेषु समः सविवर्जितः ।।12-18।। याचा अर्थ जी व्यक्ती शत्रू-मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते असा पुरुष मला प्रिय असतो.
सुबोध गोखले असेच ईश्वराला प्रिय असावेत म्हणून भगवंताने सांगितलेली गीता हस्तलिखित स्वरूपात लिहिण्याचे आणि ती मुद्रित ग्रंथरूपाने प्रकाशित करण्याचे अद्वितीय कार्य सुबोध गोखले यांच्यावर सोपवले आणि त्यांच्याकडून ते करवून घेतले.
गुडघ्यावर बसून हात जोडून कृष्णाला धर्माचरण सांगण्याची याचना करणाऱ्या अर्जुनाचं मुखपृष्ठ. त्याला असणारी अश्वरथाची आणि पाठीवर अंबारी धारण केलेल्या हत्तींची पार्श्वभूमी. भगव्या रंगातील मुखपृष्ठ या ग्रंथाच्या देखणेपणात भरच घालते. मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत यातील एकही अक्षर मुद्रित नाही हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच प्रत्येकाच्या संग्रही असावा असा हा ग्रंथ आहे.