के. श्रीनिवासन
करोनामुळे रुग्णांचे एकीकडे हाल होत असल्याचे चित्र असतानाच मृत्यूनंतरही त्यांच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. अनेक रुग्णालये आणि प्रशासन मृतदेहांबाबत असंवेदनशीलता दाखवत आहेत. मृतांवरही संस्कार करण्याची आपली संस्कृती आहे. हीच संस्कृती जिवंत ठेवत करोनाबाधित मृतदेहांबाबतही संवेदनशीलता दाखविणे गरजेचे आहे.
रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार होणे हा व्यक्तीचा अधिकार आहे; परंतु करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांवर अंत्यसंस्कार करताना कुटुंबीयांना उपस्थित राहण्यास परवानगी नाही. संसर्ग पसरू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असला, तरी प्रशासनाकडून मृतदेहांची जी हेळसांड सुरू आहे, त्यातून असंवेदनशीलतेचे दर्शन घडते. मृतदेह खड्ड्यात फेकून देण्याच्या कर्नाटक आणि पद्दुचेरीमधील घटना निंदनीय असून, यंत्रणेतील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे.
करोना संसर्गाच्या काळात एकीकडे लोकांची लाचारी वाढली आहे तर दुसरीकडे यंत्रणेतील दोष आणि संवेदनहीनताही उघड होत चालली आहे. करोनाच्या चाचण्यांची पुरेशी व्यवस्था नसणे, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरेशी साधने उपलब्ध न होणे, रुग्णांना रुग्णालयात जागा मिळू न शकणे अशा दोषांकडे सुरुवातीपासूनच बोट दाखविले जाऊ लागले होते. आता तर करोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या अंत्यसंस्कारांविषयीही गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सध्याच्या काळात आपल्या देशात करोनाचे दररोज सुमारे वीस हजार रुग्ण वाढत आहेत.
दुसरीकडे असंख्य लोकांच्या अद्याप चाचण्याच होऊ शकलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढणेही स्वाभाविक आहे. रुग्णालये आणि शवागारांमध्ये अंत्यसंस्कारांची प्रतीक्षा करीत असलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कारांची व्यवस्था करणे कठीण बनत चालले आहे. मृतांवर त्यांच्या नातेवाईकांकडून नव्हे तर प्रशासनाकडूनच अंत्यसंस्कार केले जातील, असा सरकारी नियम आहे. अंतिम दर्शन घेण्यासाठी कुटुंबातील काही व्यक्तींना थोड्या वेळासाठी मृतदेहाजवळ जाऊ दिले जाते.
मृतांवर शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जावेत, असे निश्चित करण्यात आले आहे. परंतु सध्या करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे स्मशानभूमीतही अंत्यसंस्कार होण्यास बराच वेळ लागत आहे. रुग्णालयांच्या शवागारांमध्ये मृतदेह ठेवण्यास जागा उरलेली नाही.
स्मशानभूमीत किंवा दफनभूमीत रीतिरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे या कामावर नियुक्त केलेले कर्मचारी मनमानी करताना आढळून येऊ लागले आहेत. सरकारी नियमानुसार करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा मृतदेह दोन तासांच्या आत शवागारात हलविण्यात आला पाहिजे; परंतु शवागारांमध्ये जागा नसल्यामुळे मृतदेह बराच काळ रुग्णालयातील खाटेवर तसाच राहू दिला जातो.
त्यामुळे आजूबाजूला उपचार घेत असलेल्या रुग्णांवर त्याचा काय मानसिक परिणाम होत असेल, याचा अंदाज सहज लावता येईल. ही परिस्थिती राजधानी दिल्लीतील आहे. अन्य राज्यांमध्ये तर याहून वाईट अवस्था आहे.
पद्दुचेरी आणि कर्नाटकात मृतदेह खड्ड्यात पुरण्यात आल्याचे आढळून आले आणि स्थानिक प्रशासनावर माफी मागण्याची वेळ आली. मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याबाबत प्रशासन किती संवेदनशून्य आहे, याचा अंदाज या घटनांवरून लावता येऊ शकतो.
कोणताही मृतदेह अशा प्रकारे खड्ड्यात फेकून देणे किंवा कसाबसा जाळून टाकणे सामाजिक आणि कायदेशीररीत्या स्वीकारार्ह नाही; परंतु करोनाच्या संसर्गकाळात ही कर्तव्ये विस्मृतीत जात असून, मृतदेहांवर कसाबसा अंत्यसंस्कार उरकण्याची मानसिकता प्रशासनात वाढीला लागली आहे. अशा प्रकारे मृतदेहांची विल्हेवाट लावण्याच्या पद्धतीवर काही स्वयंसेवी संस्था आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आक्षेप घेणे स्वाभाविकच होते.
करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधितांच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारांपासून दूर ठेवण्याचा नियम तयार करण्यात आला. कारण इतरांना संसर्ग होऊ नये, असा त्यामागे हेतू होता. परंतु तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारे अंत्यसंस्कार विधीत सहभागी होणाऱ्यांना कोणताही धोका नाही. मृतदेहाला स्पर्श न करण्याचा नियम मात्र पाळला गेला पाहिजे. त्यामुळे अंत्यसंस्कारांपासून मृताच्या कुटुंबीयांना दूर ठेवणे उचित ठरत नाही. आपल्या देशात मृतावरही “संस्कार’ केले जातात ही परंपरा आहे. परंतु आजाराच्या भीतीने प्रशासनाकडून मात्र मृतदेहांशी पशूसारखा व्यवहार केला जात आहे.
एखाद्या शत्रूशीसुद्धा असे वर्तन कुणी करणार नाही. यंत्रणेतील त्रुटी दूर करणे, पर्यायी यंत्रणा उभारणे आणि मृतदेहांवर सद्भावना राखून अंत्यसंस्कार करणे आवश्यक आहे. मात्र, त्याऐवजी मृतदेहांबाबत अशा गोष्टी समोर येणे हा असंवेदनशीलतेचा कळस मानायला हवा.