बिबट्याचा मोर्चा आता लोणी-धामणीकडे
लोणी धामणी – येथील लंके वस्ती येथेगोठ्यातील जरशी वासरावर हल्ला करून त्याला जखमी केले. हल्ल्यानंतर काही तासांनी ते वासरू मृत्यू पावले आहे. वनविभागाने या घटनेची दखल घेत परिसरात त्वरित पिंजरा लावला आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते उद्धव लंके यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि. 2) पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने संपत निवृत्ती लंके यांच्या जरशी वासरावर हल्ला केला. याबाबत उध्दव लंके यांनी गस्तीवर असणाऱ्या मंचर पोलीस स्टेशनच्या भरारी पथकाला याची कल्पना दिली.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. लंके यांनी वनपरिमंडल अधिकारी शेखर बैचे यांनाही घटना कळविली. रविवार (दि. 2) सकाळी नऊ वाजता वनपाल एस. एल. अनासूने व व वनकर्मचारी आदक व बी. यू. लंके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. लाखणगाव, काठापूर बुद्रुक, पारगाव-शिंगवे, पोंदेवाडी, जारकरवाडी, निरगुडसर या ऊस बागायत पट्टयात ऊसतोड सुरू असल्याने बिबट्याचे दडणक्षेत्र कमी होत चालल्याने बिबट्याने आपला मोर्चा आता लोणी-धामणी (ता. आंबेगाव) परिसराकडे वळविला आहे.
या परीसरात श्री म्हाळसाकांत मंदिरा पासून ते खंडागळे-लंके वस्तीपर्यंत डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांसाठी दडण क्षेत्र आहे. या घटनेनंतर या भागात वनविभागाने तातडीने येथे पिंजरा लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगन लंके, वसंत लंके, अंकुश लंके, शांताराम लंके, दिलीप आदक यांनी केली होती. त्यानुसार या भागात लगेच पिंजरा लावण्यात आला आहे.
लोणी येथे बिबट्यासाठी लावला पिंजरा
लोणीधामणी (ता. आंबेगाव) येथील लंके वस्तीवर व आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने तसेच या बिबट्याच्या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाने ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. बिबट्याला जरेबंद करण्यासाठी वनविभागाने त्वरीत कार्यवाही केल्याबद्दल ग्रामस्थांनी संबधीत प्रशासनाचे आभार मानले आहेत.