पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेनंतर अन्न सुरक्षा यंत्रणा सक्रिय
नवी दिल्ली – हॉटेलमध्ये दुग्धजन्य बटर ऐवजी वनस्पतीपासून तयार केलेल्या लोण्याचा (मार्गरिन) अधिक प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे, असे लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
सर्व हॉटेलचालकांना मार्गरिनचा वापर कमी करण्याच्या सूचना जारी करण्याची गरज आहे, असे पत्र गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. पंतप्रधान कार्यालयाने गडकरी यांच्या या सूचनेची तातडीने दखल घेऊन अन्न दर्जा सुरक्षा यंत्रणेला यावर ताबडतोब कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडियाने या संदर्भात माहितीची जमवाजमव सुरू केली आहे.
याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गडकरींनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, वनस्पतीपासून तयार करण्यात येत असलेल्या मार्गरिनमध्ये फॅटस्चे प्रमाण जास्त असते. जागतिक पातळीवर याचा उपयोग कमी केला जात असताना भारतातील हॉटेलचालक मात्र याचा जास्त उपयोग करीत आहेत.
दुग्धजन्य बटरपेक्षा मार्गरिनची किंमत कमी असते. त्यामुळे नफा कमविण्यासाठी जनतेच्या आरोग्याशी तडजोड केल्याचा प्रकार घडत आहे, अशा तक्रारी देशातील दूध उत्पादकांच्या संघटनांनी केल्या होत्या. एफएसएसएआयने बेकरीच्या पदार्थात किंवा इतर अन्नप्रक्रिया उद्योगात मार्गरिनचा वापर 5 टक्क्यांपेक्षा जास्त करू नये, असे सांगितले आहे.