कोपरगाव – विद्यार्थ्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच कायदा व सुव्यवस्थेचे पालन स्वतःपासूनच करावे, म्हणजे सद्यपरिस्थिती आणि भविष्यातही कोणतीच समस्या निर्माण होत नाही; अन्यथा आपले करिअर बरबाद होऊ शकते, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या स्थापनेस 40 वर्षे झाली असून, सन 2023-24 हे वर्ष “रूबी जुबली’ वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत संजीवनी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित “कायदा व सुव्यवस्था’ विषयावर ते बोलत होते. इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते. या वेळी पोलीस उपनिरीक्षक महेश येसेकर आणि प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे व्यासपीठावर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले की,. फेसबुक, इन्स्टाग्रामचे काही लोक बनावट अकाउंट तयार करून इतरांना फसवितात किंवा एखाद्याची बदनामी करण्यासाठी वापर करतात. असे कोणी करूच नये, कारण अशा प्रकारच्या सायबर क्राईममध्ये कधीना कधी पकडले जातेच, असे त्यांनी सांगितले.
उपनिरीक्षक येसेकर म्हणाले की, सोशल मीडियामध्ये आजची तरुणाई गुरफटली असून, तंत्रज्ञानाचे फायदे असले तरी तसे तोटेही आहेत. आपण सोशल मीडियाच्या किती आहारी जायचे, हे आपण आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने ठरविले पाहिजे. विद्यार्थी अवस्था ही भविष्यात आपले करिअर घडविण्यासाठीचा सुवर्णकाळ असतो.आपण भविष्यात कोणत्याही गुन्ह्यात अडकणार नाही, याची काळजी घ्यावी, असे म्हणाले.