वनविभागाने झोपेचे सोंग घेतले असल्याची सुपे परिसरात चर्चा
मोरगाव- बारामती व दौंड तालुक्यात विस्तारलेल्या मयुरेशवर अभयारण्यात सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. वन विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या वाढत्या प्रकाराला राजरोसपणे खतपाणी घातले जात असून, भविष्यात येथील वन्यजीवांचे भवितव्य धोक्यात येणार काय? असा सवाल वन्यप्रेमींमधून व्यक्त होत आहे.
शासनाकडून “झाडे लावा झाडे जगवा’ असा जनजागृती करून संदेश दिला जात असतानाच ऐतिहासिक सुपे गावाजवळ सुरू असलेल्या वृक्षतोडी प्रकाराकडे वन विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेतल्याची चर्चा परिसरात होत आहे. तालुक्यातील पश्चिम भागात बारामती व दौंड तालुक्यात सुमारे 550 हेक्टर क्षेत्रावर हे मयुरेश्वर अभयारण्य विस्तारलेले आहे.
या अभयारण्यात सध्या विविध प्रकारची दुर्मिळ झाडे असून, त्यामुळे हरिण ससे, लांडगे, कोल्हे, तरस यांसह विविध प्रकारच्या दुर्मिळच पक्ष्यांसाठी हे जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. त्यामुळे वर्षभरात अनेक पर्यटक पशू प्रेमी या अभयारण्याला आवर्जून भेट देऊन जंगल पर्यटनाचा आस्वाद लुटतात.
मोठ्या प्रमाणात विस्तारलेले क्षेत्रफळ मुबलक चारा व पाण्यामुळे या अभयारण्यात जंगली प्राणी व पशु पक्ष्यांचे कळप दिसून येतात; परंतु येथे कार्यरत असलेल्या वन अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मेंढपाळांनी शेळ्या बकऱ्यांच्या चाऱ्यांसाठी खुलेआम वृक्षांची कत्तल सुरू केली आहे. तसेच परिसरातील नागरिकांनीही सरपणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड सुरू केली आहे.
मयुरेश्वर अभयारण्यात वनविभागाने देखभाल व संवर्धनासाठी वनमजुरांची नेमणूक केली आहे; मात्र तरीपण सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने हे अधिकारी, वनमजुर करतात तरी काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वन्यजीवांचे आश्रयस्थान नष्ट होण्याची भीती
मयुरेश्वर अभयारण्यात सुरू असलेले बेसुमार वृक्षतोड व झोपेचे सोंग घेतलेल्या वन विभागाकडून होणारे दुर्लक्ष यामुळे दुर्मिळ वन्यजीवांचा आश्रयस्थान नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. अभयारण्यातील प्रचंड वृक्षतोडीमुळे वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून हा सर्व प्रकार माहीत असतानाही ही संबंधित विभागाने डोळेझाक करीत बघ्याची भूमिका का घेत आहे.या प्रकारामुळे “सारा गाव मामाचा, पण कुणी नाही कामा’चा अशी म्हणण्याची वेळ वन्यप्रेमींवर आली आहे.
वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा
सध्या या अभयारण्यातील अनेक दुर्मिळ वृक्षांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत असून, याला जबाबदार कोण? या अभयारण्यातील बेसुमार वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवून वन्यजीवांच्या रक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बेसुमार वृक्षतोडीला आळा घालून वृक्षतोड करणाऱ्यांवरवर कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातील वन्यप्रेमीकडून होत आहे.