नवी दिल्ली – देशातील सौर उर्जेचे उत्पादन वाढवण्यासाठी एनटीपीसी या सरकारी कंपनी मार्फत पुढील तीन वर्षात म्हणजे सन 2022 पर्यंत एकूण 50 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या द्वारे सौर उर्जेचे उत्पादन 10जीडब्ल्यु इतके केले जाणार आहे. अपारंपारीक उर्जा क्षेत्रात उत्पादन वाढवण्यासाठी एनटीपीसी प्रयत्नशील आहे. सध्या या कंपनीकडून 920 मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जेचे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत एनटीपीसी 23 हजार मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जेचे प्रकल्प उभारण्यासाठी निवीदा मागवणार आहे. त्यानंतर दर वर्षी सौर उर्जेत 4 जी डब्ल्यु इतकी वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पांसाठी बाजारातून पैसा उभारला जाणार आहे. ग्रीन बॉंड विक्रीला काढून ही निधी उभारणी करण्याची कंपनीची योजना आहे. सौर उर्जा प्रकल्पातून मिळणारी वीज 3 रूपये प्रतियुनिट इतकी स्वस्त उपलब्ध व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.