मुंबई – करोनाच्या संकट काळात राज्यात रक्ताची टंचाई भासत असल्याने त्यावर मात करण्यासाठी आरोग्य विभागाने अनोखी शक्कल लढविली आहे. रक्तदानाचे प्रमाण वाढावे यासाठी समाज माध्यमांचा वापर करण्याचे पाऊल राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) उचलले आहे. त्याअनुषंगाने आता एसबीटीसीने फेसबुकचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनाच्या लॉकडाऊन काळात राज्यातील रक्तसाठा कमी होत आहे. गर्दी टाळणे आणि करोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी रक्तदान शिबीरांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन झाले नाही. काही ठिकाणी सुरक्षित अंतर पाळत रक्तदान शिबीरे घेण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते, त्याला चांगला प्रतिसादही मिळाला.
आता लॉकडाऊन शिथील केले आहे. करोनाबरोबरच अन्य आजारांतील गरजू रुग्णांच्या उपचारात ज्यांना रक्ताची गरज आहे. त्यांना ते वेळेवर मिळावे यासाठी सामाजिक संस्थांच्या रक्तदान शिबीरासोबतच फेसबुकच्या रक्तदान टूल या सेवेची मदत घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.
या उपक्रमात राज्यभरातील सुमारे 71 शासकीय रक्तपेढ्यांची फेसबुकच्या रक्तदान मोहिमेच्या व्यासपीठावर नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर एखाद्या रक्तपेढीला रक्ताची गरज भासली तर ती पेढी फेसबुकच्या पेजवर तशी मागणी करेल. त्यानंतर फेसबुकमार्फत संबंधीत रक्तपेढीच्या विभागातील, शहरातील रक्तदात्यांना रक्तदानाबाबत संदेश दिला जाईल. कुठल्या रक्तपेढीत जाऊन कुठल्या गटाचे रक्त द्यायचे याची माहिती दिली जाईल. त्यामुळे वेळीच आवश्यक त्या गटाचे रक्त उपलब्ध झाल्यावर रुग्णाचे प्राण वाचू शकतात.
फेसबुक सारख्या समाज माध्यमाचा वापर रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमासाठी झाल्यास त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.