झारखंड विधानसभा निवडणूकीत भाजपकडून नारा
रांची – झारखंडमध्ये होणाऱ्या आगामी विधासना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर “अब की बार, 65 पार’ अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी दिली आहे. झारखंडमध्ये वर्षाअखेर विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी भाजपने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दास म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देशात विकासाचा संदेश आम्ही जनतेपर्यत पोहोचविला आहे. आम्ही जनतेच्या विश्वासला पात्र ठरत असल्याने आम्हाला पुन्हा यश मिळणार असल्याचा विश्वास आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत “अब की बार 65 पार’ अशी घोषणा देण्यात आली आहे. या घोषणेनुसार पक्ष निश्चितच ध्येय गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपने सत्ता काळात विकासासाठी ठोस पावले उचललेली आहेत. तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी कडक ध्येयधोरण निश्चित केले आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. तसेच पुढील पाच वर्षे मोदी विकासाला आणखीन गती देणार असल्याने जनता आम्हाला राज्यात पुन्हा संधी देईल, असे दास म्हणाले.
विरोधकांवर निशाण साधताना दास म्हणाले, लोकसभा निवडणूकीत जनतेले “महागठबंधन’ला त्यांची जागा दाखवून दिली आहे. देशभरात विरोधकांचा सुपडा साफ झाला असून विधानसभा निवडणूकीतही त्यांना पराभवाला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, झारखंड राज्याची स्वतंत्र निर्मिती झाल्यानंतर पाच वर्षाचा काळ पूर्ण करणारे रघुबर दास हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. 2014मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजपने 81 पैकी 42 जागा जिंकत मोठा विजय मिळविला होता. तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीतही रघबर दास यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने 14 पैकी 12 जागा जिंकत निर्विवाद यश मिळविले होते.