अभ्यासक्रम कपातीचा शासन निर्णय स्वागतार्ह
विद्यार्थी, शिक्षकांचे टेन्शन कमी होणार : तज्ज्ञ
– डॉ. राजू गुरव
पुणे – राज्यात करोनाचे संकट असतानाही शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले असले, तरी त्याला बऱ्याचशा मर्यादा येत आहेत. सर्वच विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होतीलच असे होत नाही. शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह, प्रशंसनीय आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक यांचे टेन्शन दूर होण्यास नक्कीच खूप मदत होणार आहे. विविध आपत्तींचा विचार करून भविष्यात शिक्षण पद्धतीतही आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे, अशी मते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक, पालक, शिक्षक संघटना, संस्थाचालक यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली आहे.
करोना संकटाच्या काळात बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय हा दिलासादायक, प्रशंसनीय आहे. यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांचे टेन्शन दूर होणार आहे. आता मिळणाऱ्या कालावधीत अभ्यासक्रम व्यवस्थितपणे पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.
– डॉ. अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
शासनाने अभ्यासक्रम कमी करण्याची विनाकारण घाई केली आहे. आम्ही काही तरी करतोय, हे दाखवून देण्याची शासनाची भूमिका चुकीची आहे. अभ्यासक्रम कमी केल्यावरून काही ना काही वाद होतात. आगामी काळात करोना आणखी वाढला, तर मग अजून अभ्यासक्रमात शासन कपात करणार का, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. सध्या आधी जीवन महत्त्वाचे असून त्यानंतर शिक्षण आहे. करोनाचे संकट दूर करून विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना राबवण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.
– डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
करोना, लॉकडाऊनमुळे अभ्यासक्रम कपात गरजेची होती. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे. शासनाने ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी एकसूत्री कार्यक्रम हाती घेणे आवश्यक असून, त्यासाठी टीव्ही चॅनेलचा प्रभावी वापर गरजेचा आहे. आजही ठोस उपाययोजना व समन्वय नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.
– संभाजी शिरसाट, अध्यक्ष, शिक्षक क्रांती संघटना
अभ्यासक्रम कमी केला ते उत्तम झाले. करोनामुळे असे निर्णय अपेक्षितच होते, पण हेच जरा आधी झाले असते तर खूप बरे झाले असते. आजवर नववी व दहावीचे ऑनलाइन वर्ग सुरू करून जवळपास तीन महिने झाले आहेत. कमी केलेल्या अभ्यासक्रमातील पहिल्या 3 पाठांतील भाग शिकवून झाला आहे. आता तिमाही आणि सहामाही परीक्षांबद्दल मार्गदर्शन मिळावे, ही अपेक्षा आहे. एका गोष्टी बद्दल काळजी वाटतेय, की इयत्ता दहावीमधील गणित आणि विज्ञानातला वगळलेला भाग बघता, ते जर विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले नाहीत, तर पुढच्या वर्षी ज्या मुलांना शास्त्र शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, त्यांना थोडे जड जाईल.
– ज्योती बोधे, प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड
अभ्यासक्रम कपातीचा निर्णय दिलासा देणारा आहे. ऑनलाइन शिक्षणाला खूप मर्यादा येतात. आपल्या शिक्षण पद्धतीही 70 टक्के थियरी व 30 टक्के प्रॅक्टिकल असा अभ्यासक्रम आहे. ऑनलाइनच्या सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत. भविष्यात मात्र अभ्यासक्रम कमी करणे हा पर्याय नसून शिक्षण पद्धतीत काय बदल करता येईल, हा विचार करण्याची गरज आहे.
– डॉ. शैलेश पगारिया, अध्यक्ष, अर्हम फाउंडेशन
यंदाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन सुरू करण्यात आले आहे. प्रत्यक्षात शाळा कधी सुरू होतील, याबाबत स्पष्टता नाही. यामुळे राज्य सरकारने अभ्यासक्रमाला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. करोनामुळे पालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देऊन दिलासा देण्याची आवश्यकता आहे.
– शैलेश विटकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देण्यासाठी असतो. मात्र, करोनाचे संकट व व्याप्ती पाहता शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल गरजेचे आहेत. त्यामुळेच अभ्यासक्रम कपातीचा निर्णय झाला. यामुळे काही अडचणी निर्माण होतील, तर काही विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक ओझे हलके वाटेल. परंतु सामाजिकशास्त्र व इतर विषयांचा विचार करता काही संकल्पना या पायाभूत असतात. त्या समजावून घेतल्यानंतरच पुढील शैक्षणिक भाग समजतो. त्यामुळे सर्व विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांनी उर्वरित अभ्यासक्रम अध्ययन-अध्यापन करताना थोडक्यात का होईना वगळलेल्या मूळ संकल्पनांचा अभ्यास करण्याची गरज आहे.
– पांडुरंग गावडे, सहशिक्षक, रामचंद्र गायकवाड माध्यमिक विद्यालय
करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होण्यासाठी जसजसा कालावधी वाढू लागला, तसतसा पालक आणि विद्यार्थी यांच्या मनामध्ये संभ्रम वाढत होता. शिवाय शिक्षकांच्या मनातदेखील अनेक प्रश्न निर्माण झाले होते. त्यावर शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मोठा दिलासा दिला आहे.
– शिवाजी खांडेकर, राज्य समन्वयक, शिक्षण बचाव कृती समिती
सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. मात्र, मोबाइल फोन, इंटरनेट या सुविधा मिळत नसल्याने बहुसंख्य विद्यार्थी या ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहापासून वंचित राहिले आहेत. शासनाने अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थी व शिक्षक हिताचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात शिक्षण विभागाने सर्व बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
– बबन उकिर्डे, संयोजक, पुणे विभाग, भाजप शिक्षक आघाडी
सध्याच्या परिस्थितीचा विचार करता अभ्यासक्रम कमी करणे हाच उत्तम मार्ग होता. त्यामुळे शासनाने त्याचा सकारात्मक विचार करून निर्णय घेतला आहे. याचा फायदाच होणार आहे. हा निर्णय दिशादर्शक ठरणार आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षणालाही योग्य दिशा मिळणार आहे.
– मुकुंद किर्दत, अध्यक्ष, आप पालक युनियन
अभ्यासक्रम कमी करण्याच्या निर्णयाचा लाभच होणार आहे. शिक्षक, विद्यार्थी यांचे दडपण कमी होणार आहे. अभ्यासक्रम कपात केला असला तरी विद्यार्थ्यांनी आगामी विविध स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून त्याकडे वेळ मिळेल तसे लक्ष देणे आवश्यकच आहे. कोणताही अभ्यास का कधीच वाया जात नाही हे लक्षात घ्यावे.
-प्रा. संतोष फाजगे, सचिव, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ