नवी दिल्ली- ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच सुरुवातीला वाद निर्माण झाला होता. त्यानंतरही हा चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहात रिलीज झाला. अवघ्या काही दिवसातच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे.’तसेच हा चित्रपट भारतामध्ये धार्मिक असंतुलन घडवू शकतो’ असे म्हणत या चित्रपटावर पश्चिम बंगाल सरकारने बंदी घातली होती. परंतु हि बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. तसेच न्यायालयाने तमिळनाडू सरकारवरही कडक टीका केली असून हा चित्रपट दाखवणाऱ्या सिनेमागृहाला सुरक्षा पुरवावी, असे म्हटले आहे.
गरज पडल्यास न्यायाधीश हा चित्रपट पाहतील…
मुख्य न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सांगितले की, “चित्रपटावर बंदी न घालण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवरही ते सुनावणी करणार आहेत. त्यावर 18 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. मग गरज पडल्यास न्यायाधीश हा चित्रपट बघतील”
यावर जमियत उलेमा-ए-हिंदचे वकील हुजैफा अहमदी यांनी न्यायाधीशांना चित्रपट लवकर पाहण्याची विनंती केली. ते म्हणाले कि, “शक्य असल्यास, न्यायाधीशांना या वीकेंडला चित्रपट पाहू द्या. तो ओटीटीवर प्रदर्शित होण्यापासून थांबवावा.” अशी मागणी हुजैफा अहमदी यांनी केली आहे.
दरम्यान, केरळ स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिस वर आतापर्यंत 165 कोटींची कमाई केली आहे. आगामी काळात देखील हा चित्रपट बक्कळ कमाई करणार असल्याचं सांगितलं जात आहे.