मुंबई – महाराष्ट्रात अखेर बैलगाडा शर्यती ला परवानगी मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज (दि. १६) बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. न्यालयाच्या या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
२०१७ साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरु होणार आहे. त्यामुळं आता पुन्हा एका घाटात ‘भिर्रर्रर्र… झाली….” चा नाद घुमणार आहे.
दरम्यान, घोडा-बैलांवरील अत्याचार थांबावेत, म्हणून एकाच गाडीला घोडा-बैल जुंपण्यास बंदी होती. शर्यतीत बैलांना चाबकाने, मोठ्या काठीने अमानुष मारणे, बॅटरीचा शॉक देणे, टोकदार खिळे लावणे, अशा अनेक प्रकारे अत्याचार केले जातात, असे सांगत या शर्यतींवर बंदी घातली होती.