रेडा -सध्या अनलॉकमुळे बहुतांश दैनंदिन व्यवहार सुरू झाले आहेत. सहाजिकच त्यामुळे नागरिकांमध्ये करोना संपुष्टात आल्याची भावना निर्माण झाली आहे, हे धोकादायक आहे. उलट नागरिकांची जबाबदारी वाढलेली आहे. दैनंदिन व्यवहार करताना बेफिकीरी नको, नागरिकांनी शासनाचे सर्व नियम पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, नागरिक बाजारामध्ये, तसेच इतर ठिकाणी दैनंदिन व्यवहार करताना सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत. जनतेला सोशल डिस्टन्सिंग पाळावे व भीती टाळून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. सहजतेने घेऊ नका, करोनासह जीवन जगण्याची मानसिकता नागरिकांनी ठेवावी, त्याशिवाय आता पर्याय नाही.
मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझरचा वापर आणि ताप, खोकला, सर्दीची लक्षणे दिसून आल्यास कमीपणा न मानता डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक हे आर्थिकदृष्टया अडचणीत आलेले आहेत मात्र, आता व्यवहार सुरू झाल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे.
शासनाने गावोगावी मनरेगा अंतर्गत विविध कामे मोठ्या संख्येने सुरू करावीत. त्याचप्रमाणे हॉटेल, सलून दुकाने, मंगल कार्यालये यांना नियम घालून देऊन सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले.