एप्रिल 2019 ते मार्च 2020 कालावधीत अपघातात जीवितहानी नाही
सेवा सुरू झाल्यापासून प्रथमच नावावर नोंद
पुणे – भारतीय रेल्वे ही प्रवासी वाहतूक देणारी सर्वात मोठी यंत्रणा आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीत रेल्वेने सर्वात सुरक्षित सेवा देली. वर्षभरामध्ये कोणत्याही रेल्वे अपघातात जीवितहानी झाली नाही. सन 1853 मध्ये रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून प्रथमच हा रेकॉर्ड रेल्वेच्या नावावर नोंदवला गेला आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून सुरक्षाविषयक उपाययोजनांवर भर देण्यात आला. यामध्ये मानवी रेल्वे फाटकांचे उच्चाटन, पूल (आरओबीज), भुयारी मार्ग तयार करणे, पुलांचे पुनर्वसन, रेल्वे रुळांचे सर्वाधिक नूतनीकरण, त्यांची प्रभावी देखभाल, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कडक देखरेख, रेल्वे कर्मचाऱ्यांचे सुधारित प्रशिक्षण, सिग्नलिंग यंत्रणेत सुधारणा, सुरक्षेच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक आयसीएफमधून टप्प्याटप्प्याने आधुनिक आणि सुरक्षित एलएचबी कोचमध्ये रुपांतरण आदींचा समावेश आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली.
यासह रेल्वेची सुरक्षा वाढविण्यासाठी 2019-20 मध्ये एकूण 1,309 रेल्वेवरील पूल आणि भुयारी मार्गांची निर्मिती केली. शिवाय, 285 रेल्वे फाटक सिग्नलद्वारे एकत्रित केले. त्यांची संख्या 11 हजार 639 आहे. तर यांत्रिक सिग्नलिंग असणाऱ्या 84 स्थानकांत इलेक्ट्रॉनिक सिग्नल लावले. सन 2017-18 मध्ये राष्ट्रीय रेल्वे सुरक्षा कोष (आरआरएसके) तयार केला. त्यांतर्गत वार्षिक 20 हजार कोटी रुपयांनुसार पुढील 5 वर्षांत 1 लाख कोटी रुपये खर्च करण्याच्या तरतुदीनुसार तातडीच्या स्वरुपाची अत्यंत गंभीर सुरक्षा कामे करणे शक्य झाल्याचे प्रशासनाने सांगितले.