मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची सुनावणीला दरवेळी तारीख पे तारीखच मिळत असल्याचे दिसत आहे. त्यातच आज झालेल्या सुनावणीत पुन्हा एकदा हे प्रकरण पुढे ढकलण्यात आले आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची सुनावणी 10 जानेवारी 2023 रोजी होणार आहे. मात्र, ही सुनावणीदेखील प्रकरणाच्या निर्देशासाठी असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गटाने या प्रकरणाची सुनावणी 7 सदस्यीय खंडपीठासमोर करण्याची मागणी केली आहे. सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्याची मागणी ठाकरे गटाकडून ही मागणी केवळ एका मुद्यांवर झाली आहे. त्यामुळे सत्ता संघर्षाच्या सुनावणीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी अतिशय महत्त्वाची आहे. पक्षांतर बंदी कायदा आणि इतर कायदेशीर बाबींचा कसा या प्रकरणाच्यानिमित्ताने लागणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सुरू आहे.
मागील सुनावणीत दोन्ही पक्षांनी कोणत्या मुद्यांवर युक्तिवाद होणार, महत्त्वाचे मु्द्दे हे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश घटनापीठाने दिले होते. दोन्ही बाजूंने अजून बऱ्याच गोष्टीवर एकमत झालेले नसल्याचे चित्र आजच्या सुनावणीत दिसून आले. आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील अॅड. कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याची मागणी केली. घटनापीठाने 2016 मध्ये सुनावलेल्या नबाम रेबिया विरुद्ध विधानसभा उपाध्यक्ष या प्रकरणातील निकालाची योग्यता ठरवण्यासाठी ठाकरे गटाने ही मागणी केली आहे.
2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार, विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव प्रलंबित असेल तेव्हा ते अपात्रतेची कारवाई करू शकत नाही. घटनापीठाकडे सत्ता संघर्षाचे प्रकरण सोपवण्यात आले तेव्हा नबाम रेबिया या खटल्यातील निकालाच्या मुद्याचा समावेश होता.