नवी दिल्ली – सोशल मीडियात (Social Media) प्रसिद्ध होणाऱ्या बाबी खऱ्या की खोट्या हे आता सरकार ठरवणार आहे आणि त्यासाठी आयटी कायद्यात दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. त्यावर माजी आयटी मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की आता सरकार ठरवेल ते खरे किंवा खोटे असणार आहे, हे पुर्णत: गैर आहे.
इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुरुवारी सांगितले की, गुगल, फेसबुक आणि ट्विटर सारख्या इंटरनेट कंपन्या खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रकाशित करणार असतील तर सरकार त्याची सत्त्यता तपासेल.
त्याची जबाबदारी पीआयबी या सरकार संस्थेला देण्यात आली आहे आणि तो मजकूर काढून टाकण्याची सुचना संबंधीत कंपन्यांना करेल. आणि त्यानुसार तो मजकूर संबंधीत कंपन्यांनी काढून टाकला नाही तर या कंपन्यांना असलेले संरक्षण काढून घेतले जाईल आणि त्यांच्यावर खटला दाखल केला जाईल.
या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना सिब्बल म्हणाले, “आता सरकार म्हणजेच पीआयबी काय खोटे आहे आणि काय नाही हे ठरवेल आणि ते सूचित करेल आणि अशा स्थितीत अमित शहा जी म्हणतात की लोकशाही धोक्यात नाही,अशी टिप्पणी कपिल सिब्बल यांनी दिली आहे.