नवी दिल्ली – केंद्र सरकारने सध्या केवळ तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. मात्र त्यांनी एमएसपी बाबत कायदा केलेला नाही. समिती स्थापन करण्याबाबत सरकार निश्चितपणे बोलले आहे, पण सरकार अतिशय संथ गतीने काम करत आहे. आमची आश्वासने पूर्ण न झाल्यास शेतकरी पुन्हा आंदोलन करू शकतात, असा इशारा शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे.
लोकांनी एमआयएमचे नेते ओवेसी यांच्यापासून सावध राहावे. ते भाजपपेक्षा धोकादायक आहेत, असे यावेळी नमूद करतानाच टिकैत यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतउत्तर प्रदेशातील शेतकरी त्यांना फायदा मिळवून देणाऱ्या राजकीय पक्षालाच मतदान करतील असे भाकित केले.
दरम्यान, पंजाबच्या शेतकरी संघटनांनी शनिवारी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी संघटनांनी एक पक्ष स्थापन केला असून त्याला संयुक्त समाज मोर्चा असे नाव देण्यात आले आहे. या पक्षाचे नेतृत्व शेतकरी नेते बलबीर सिंग राजेवाल करणार आहेत. हा पक्ष पंजाब विधानसभेच्या सर्व जागा लढवणार आहे. पक्ष स्थापनेच्या निर्णयावर राजेवाल म्हणाले की, पंजाबच्या जनतेची मागणी आणि दबावानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी संघटनांनी स्थापन केलेल्या पक्षात आणखी तीन शेतकरी संघटना सामील झाल्याची देखील चर्चा आहे.