नगर – पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार राम शिंदे यांच्यातील वाद कसाबसा शमला असतांना आता पुन्हा जिल्हा भाजपमध्ये निष्ठावंतांचा वाद पक्षात धुमसू लागला आहे. काल रविवारी जिल्ह्यातील प्रमुख निष्ठावंतांची खास बैठक झाली असून बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे यांची थेट नावे न घेता त्यांच्याविरोधातील खदखद व्यक्त झाली. त्यांच्याकडून निष्ठावंतांवर अन्याय होतो, अशी भावना व्यक्त करताना जे पक्षाचे मूळचे आहेत, ते आमदार राम शिंदे यांच्याविषयीही नाराजी व्यक्त झाली. त्यामुळे आता भाजपत निष्ठावंत अन् नव्याने आलेले असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
30-40 वर्षात अनेकांनी भाजप वाढीसाठी परिश्रम घेतले. त्यामुळे जिल्ह्यात पक्षाची तीस ते पस्तीस टक्के व्होट बॅंक आहे, बाहेरून घेतलेले नेत्याची दहा ते पंधरा टक्के मते त्यात समाविष्ट होऊन 51 टक्के मतांनी बाहेरच्यांना राजकीय संधी मिळतात, पण यात निष्ठावंतांना नंतर डावलले जाते. त्यामुळे आता पक्षाची व्होट बॅंक संपत आहे. पक्षाचे तिन्ही जिल्हाध्यक्ष निष्ठावंत झाले नाही तर निष्ठावंत कार्यकर्ते मतदान करणार नाहीत व कोणाच्या प्रचारालाही बाहेर पडणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.
जिल्हाभरातील सर्व जुन्या निष्ठावंतांना एकत्र करून दबाव वाढवत न्यावा लागणार आहे, ही आरपारची लढाई आता लढावी लागणार आहे, असा आवाहन करून लवकरच जिल्हाभरातील सर्व जुन्यांना एकत्र करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्याचे ठरविण्यात आले आहे. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड तसेच ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी यांच्या पुढाकाराने शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक झाली.
यावेळी ज्येष्ठ नेते वसंत लोढा, शांतीलाल कोपनर, बाळासाहेब सोनवणे, अनिल गट्टानी, अशोक खेडकर, रघुनाथ आंबेडकर, दादासाहेब बोठे, बाळासाहेब पोटघन, संतोष लगड, स्वप्निल देसाई, चेतन जग्गी, अशोक आहुजा, कृष्णकांत बडवे, अशोक गायकवाड, रवी सुरवसे, राजेंद्र मोते, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम आदिसह जिल्हाभरातील सुमारे 35 ते 40 उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष आता मुंडे-महाजनांचा राहीलेला नाही, तो खूप बदललेला आहे. मात्र, आताच्या राजकारणात पक्षाच्या निष्ठावंतांना डावलले जात आहे. त्यामुळे किमान पक्षाची संघटना तरी निष्ठावंतांना दिली जावी. असे झाले नाही तर पक्षाच्या व्होट बॅंकमधील अस्वस्थता अधिक वाढेल, असा दावाही यावेळी करण्यात आला. यासंदर्भात लवकरच व्यापक बैठक घेऊन पक्ष श्रेष्ठीसमोर जिल्ह्यातील निष्ठावतांची नाराजी मांडण्याचे नियोजन ठरवले गेले आहे.
राजकीय गणिते साधण्यासाठी बाहेरून पक्षात कोणाला घ्यायला हरकत नाही,मात्र यामुळे निष्ठावंत डावलले जाणार नाही, याची दक्षता पक्षश्रेष्ठींनी घेतली पाहिजे. सध्या जिल्ह्यामध्ये पक्षाच्या प्रत्येक बैठकीत व कार्यक्रमात जुन्यांचा अपमान होतो. कोणत्याही कार्यक्रमात त्यांना नियोजनात घेतले जात नाही. त्यांचा सन्मान होत नाही. पक्षाचे निवडक पदाधिकारी सोडले तर अन्य कोणाला विचारले जात नाही, असे विविध दावे या बैठकीत करण्यात आले.
बहुतांशी वक्तांनी विखे पिता- पुत्र व राम शिंदे यांची थेट नावे घेतली नाहीत. मात्र, जिल्ह्याचे पक्षाचे नेतृत्व हे तिघेच असल्याने सुचक शब्दांत त्यांच्याविषयीची तीव्र नाराजी व्यक्त झाली. निष्ठावंतानी आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला आहे. या बैठकीने जिल्ह्यातील भाजपमध्ये असलेली खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
तर कसबा-कर्नाटक होईल
भाजपमधील निष्ठावंतांना अशाच पद्धतीने सतत डावलले गेले तर पक्षाचे अतोनात नुकसान होईल. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील निकाल व कर्नाटक राज्यातील निकालासारखी स्थिती पक्षाची होईल. पक्षाचे मूळ मतदार मतदानासाठी बाहेर न पडल्याने या दोन्ही निवडणुकात पक्षाचे पराभव झाले, असे सूचक भाष्यही या बैठकीत करण्यात आले. “कोणाच्या विरोधात ही बैठक नव्हती, पक्ष संघटनात्मक कामकाजात जुन्या कार्यकर्त्यांना सन्मानाने संधी मिळावी, या हेतूने ही बैठक झाली आहे. याबाबत लवकरच अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल,” असे माजी जिल्हाध्यक्ष भाजप भानुदास बेरड म्हणाले.