आळंदी (एम. डी. पाखरे) -अवघाचि संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्हीं लोक।।
जाईन गे माय तया पंढरपुरा। भेटेन माहेरा आपुलिया।।
सर्व सुकृताचें फळ मी लाहीन। क्षेम मीं देईन पांडुरंगी।।
बापरखुमादेवीवरु विठ्ठलेंसी भेटी। आपुले संवसाटी करुनि ठेला।।
टाळ, पखवाजाचा निनादात.. ज्ञानोबा माऊली.. ज्ञानोबा माउलींच्या गजरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात, भक्तिमय वातावरणात लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान मानाच्या दिंड्याना क्रमाक्रमाने प्रवेश देण्यात आला. दिंडीतील वारकरी मंदिरात येताच त्यांचा मोठा उत्साह दिसून येत होता. फुगडी, पाऊली, तसेच मनोरा रचून त्यावर पखवाज वादन करत मुखाने ज्ञानोबा माऊलीचा गजर वारकरी करत होते. मानाच्या 47 दिंडीतील प्रत्येक दिंडीतील 75 वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला होता. अडीच वाजल्यापासून पावणे सात वाजेपर्यंत माउली मंदिरात हरीनामाचा गजर सुरू होता. सर्व मानकऱ्यांचे परंपरेचे कार्यक्रम उरकून माउलींची आरती होऊन पावणे सात वाजताच्या दरम्यान मानाचे खांदेकऱ्यांनी पालखी मंदिराबाहेर आणली. ठरलेल्या मार्गाने पालखी प्रदक्षिणा होऊन पालखी माउलींचे आजोळघरी विसावली.
प्रदक्षिणा रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात भाविक पालखीच्या स्वागतासाठी थांबले होते. पालखी दिसताच प्रत्येकाच्या ओठातून आपोआप माऊली… माऊली… उच्चार बाहेर पडत होते. माउलीच्या प्रस्थान सोहळ्यासाठी राज्यासह पर राज्यातील लाखो भाविक 2 दिवस आधीपासून आळंदीत दाखल झाले होते. माऊलींचा आजचा पहिला मुक्काम त्यांचे आजोळघर गांधींवाडा आळंदी येथेच होणार असून सोमवारी (दि. 12) सकाळी 6वाजता पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.
वारकरी आणि पोलिसांमध्ये झटापट
गेल्या वर्षी प्रस्थान सोहळ्याला माउली मंदिरात वारकऱ्यांची संख्या जास्त झाल्याने प्रस्थानाला उशीर झाला होता. त्यामुळे यावर्षी माऊली संस्थान कमिटीने मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मानाच्या 47 दिंडीतील प्रत्येक दिंडीतील 75 वारकऱ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंदिरात जास्त गर्दी होऊ नये म्हणून पासधारक यांच्याशिवाय कोणालाही मंदिरात प्रवेश देण्यात येऊ नये असा निर्णय होता. त्यासाठी पोलिसांनी पास धारक आणि मानाचे दिंडीतील वारकरी यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. यासाठी पोलिसांनी मंदिराच्या सर्व बाजूना मोठा बंदोबस्त ठेवला होता. बॅरिगेट लावण्यात आले होते. मात्र दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान अचानक काही वारकरी मोठ्या संख्येने बॅरिगेट बाजूला करून महाद्वाराकडे धावत येत होते. यावेळी पोलिसांनी त्या वारकऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. यानंतर काही मिनिटांत परिस्थिती निवळली.