पुणे: टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये मागील तीन वर्षांपासून टेरिफ युद्ध रंगलेले सर्वानी पहिले आहे. परंतु आता हे टेरिफ युद्ध संपण्याच्या वाटेवर आहे. कारण आता एफयुपीच्या नव्या वादाने डोके वर काढले असून जिओ, व्होडाफोन, एअरटेल या कंपन्यांनी त्यांचे रिचार्जचे दर वाढविले आहेत. तसेच लवकरच इनकमिंग कॉल साठी देखील शुल्क आकारले जाणार आहे.
१९९५ च्या सुमारास आपल्याकडे मोबाईल सेवा सुरु झाली तेंव्हा इनकमिंग आणि आऊटगोईंग साठी पैसे आकारले जात असत. त्यानंतर हळू हळू आउटगोइंग चे दार कमी होत गेले आणि इनकमिंग देखील मोफत झाले. त्यानंतर आऊटगोईंग साठी जितके सेकंद बोललं तेवढेच पैसे आकारले जाऊ लागले. टाटाने जपानची कंपनी डोकोमोसोबत करार करत ही सुविधा दिली होती. त्यानंतर 10 पैसे, 20 पैसे, 30 पैसे कॉल अशा खैराती सुरू झाल्या.
तोपर्यंत इंटरनेट देखील मोठ्या प्रमाणात सुरु झाले होते. इंटरनेट विश्वात वारंवार बदल होत टूजी,थ्रीजी, फोरजी आले. या सर्वांसाठी त्याकाळच्या कम्पन्यानाकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारणी केली जात असतानाच, अचानक जिओ कंपनीने स्पर्धेत उडी घेतली. जिओने 120 ते 150 रुपयांत महिनाभर मोफत कॉलिंग आणि फोर जी इंटरनेट फ्री दिल्यावर मात्र एकच झुंबड उडाली होती. त्यामुळे ग्राहकांची लूट करणाऱ्या इतर कंपन्यांना मात्र चांगलाच आळा बसला. या कंपन्यांनाच करोडो जीओकडे वळल्याने त्यांनीही जिओच्या तोडीला रिचार्जची रक्कम आणून ठेवली.
परंतु आता जिओवरून अन्य नेटवर्कवर कॉल करायचा असल्यास युजरला 6 पैसे मिनिटाला मोजावे लागणार आहेत. यामुळे रिचार्जची किंमत वाढली आहे. अशातच येत्या तीन ते चार तिमाहींमध्ये इनकमिंग कॉल मोफत देण्याची सुविधाही बंद होणार असल्याचे संकेत विश्लेषकांनी दिले आहे. यामुळे पूर्वीसारखे दर नसले तरीही पूर्वीचे इनकमिंगलाही पैसे मोजण्याचे दिवस परत येण्याची चिन्हे आहेत.