नगर -करोनामुळे मागील दोन वर्षात झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळा नियमितपणे म्हणजेच पूर्ण वेळ सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगारे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पंचायत समित्यांचे गटशिक्षणाधिकारी आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.
साधारणपणे मार्चपासून सकाळच्या वेळेत शाळा भरण्यास परवानगी दिली जाते. या शैक्षणिक वर्षात मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्याऐवजी पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीचे वर्ग असणाऱ्या शाळा पूर्ण वेळ सुरू ठेवाव्यात. एप्रिलअखेरपर्यंत शनिवारी शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात तसेच रविवारी ऐच्छिक स्वरुपात शाळा सुरू ठेवता येतील.
इयत्ता पहिली, नववी आणि अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा एप्रिल महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात घ्याव्यात आणि निकाल मे महिन्यात जाहीर करावा. दररोज शंभर टक्के विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. शनिवारपासून शाळा कशा पद्धतीने भरवाव्यात याचे वेळापत्रक या पत्रात दिले आहे. दरम्यान, आता कडाक्याचा उन्हाळा सुरू आहे. दिवसाच्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.