जनतेने दिलेल्या जनादेशाचा शिवसेनेकडून अवमान
पालघर – शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन देताना मोदी साहेबांच्या भरवशावर शब्द दिला होता का? सरकार तयार करताना मोदी आठवले नाहीत का? असे सवाल करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी स्व. बाळासाहेबांना दिले होते. मात्र ते कॉंग्रेस – राष्ट्रवादीसोबत मुख्यमंत्री करेन असं होत का? असा सवाल त्यांनी केला. आता मातोश्रीवरून आदेश येत नाहीत, तर दिल्लीच्या मातोश्री सोनियाजी आदेश देतात, असा टोलाही त्यांनी लगाविला.
महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशाचा अवमान करून जनतेशी विश्वासघात करून स्थापन झालेल्या राज्य सरकारकडून आता राज्यातील शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका प्रारंभ झाली आहे, असा आरोप फडणवीस यांनी आज पालघर येथे बोलताना केला. सहा जिल्ह्यात होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आज पालघर जिल्ह्यातील कासा(वरोती) येथे नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला.
फडणवीस म्हणाले, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने अतिशय योग्य असाच कौल दिला होता. निवडणुकीआधी झालेल्या युतीला त्यांनी स्पष्ट बहुमत दिले होते. त्यामुळे त्यांची काहीच चूक नाही. मी त्यांचे आभार मानण्यासाठी येथे आलो आहे. पण, आमच्या मित्रांनी जनादेशाचा विश्वासघात केला आणि नव्या मित्रांशी घरोबा केला. आता त्यांनी निदान राज्यातील सरकार नीट चालवायला हवे. विश्वासघात हा जसा या सरकारच्या गठनाचा पाया आहे. तसेच आता त्यांनी आपल्या एकेक निर्णयातून जनतेच्या, शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका सुरू केली आहे, असे फडणवीस म्हणाले.
नव्या कर्जमाफी योजनेतून त्यांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मुद्दाम वगळले. त्यामुळे त्यांना कोणताही लाभ यातून मिळू शकत नाही. आमच्या मासेमार बांधवांना कुठलीही मदत मिळू शकत नाही. ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. पण सप्टेंबर 2019 ची अट टाकल्याने हे शेतकरी मदतीला मुकणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार होते. मात्र शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, असेही ते म्हणाले.