मुंबई – डाळ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक भारतीयांच्या घरामध्ये दररोज शिजवली जाते. परंतु सध्या डाळींच्या वाढत्या किंमती पाहता लवकरच ही डाळ स्वयंपाक घरातून गायब तर होणार नाही ना अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. एप्रिल महिन्यापर्यंत डाळींच्या किमतींवर सरकारने नियंत्रण ठेवले होते. परंतु आता मे महिन्यामध्ये डाळींच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे.
कंज्युमर अफेयर विभागाची आकडेवारी नक्कीच सर्वांना धक्का देणारी आहे. जर अशीच या आकडेवारींमध्ये वाढ होत गेली तर स्वयंपाक घरातून डाळ नक्कीच गायब होईल अथवा ती जनसामान्यांच्या आटोक्याबाहेर जाईल हे नक्की.
कंज्युमर अफेयर विभागाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यामध्ये तुरीच्या डाळींची सरासरी किंमत 116.68 रुपये होती. परंतु आता 18 मे रोजी समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही किंमत वाढून 118.98 रुपये इतकी झाली असून मे महिन्याच्या अखेरीस या किंमती 120 रुपयाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास मध्यमवर्गीय लोकांना याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे.
मे महिन्यात फक्त तूरीच्या डाळींच्या किंमतीत वाढ झाली नाही, तर मूग डाळ, तूर डाळ, उडीद डाळ आणि चन्याच्या डाळींच्या किंमती देखील वाढल्या आहेत. मूग डाळींच्या किमतींविषयी सांगायचे झाल्यास 18 मे दरम्यान डाळींच्या किंमतींमध्ये 107.29 रुपयांवरून 108.41 रुपयांची वाढ झाली आहे. तर उडीद डाळींच्या किंमतीत 108.23 रुपयांवरून 109.44, तर चन्याच्या डाळींच्या किंमतीत 73.71 रुपयांवरून 74.23 रुपयांची वाढ झाली आहे.
सरकारची भूमिका काय ?
डाळींच्या वाढत्या किंमतींमुळे सरकार देखील चिंतेत आहे. त्यामुळे डाळींच्या वाढत्या किंमती पाहता केंद्र सरकारकडून एक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, कोणीही एका महिन्यापेक्षा जास्त काळ डाळींचा साठा करुन ठेवू शकत नाही. जर कोणी असे केले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच डाळींच्या आयातीवर देखील कठोर निर्बंध लावण्यात आलेले आहेत. खरेतर भारतात 70 टक्के तूरडाळ आयात केली जाते.