मुंबई – देशात करोना संसर्गाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यातही महाराष्ट्रात दररोज करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असून रुग्णसंख्या वाढीत रोज नवा विक्रम होत आहे. नागपूर, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या जिल्ह्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना औरंगाबादमध्ये आता मृतांच्या संख्येमध्येही वाढ झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात दररोज हजारच्या पुढे रुग्ण आढळत आहेत. त्याचवेळी जिल्ह्यात १ ते १९ मार्च दरम्यान करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण पाहिले तर तब्बल १२० रुग्णांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ३८८ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे.
गेल्या महिन्यात १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान ३० रुग्णांना आपला जीव करोनामुळे गमवावा लागला होता. मार्च महिन्यांत यात मोठी वाढ झाली आहे. १ मार्च ते १९ मार्च या कालावधीत तब्बल १२० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून करोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहे.