नवी दिल्ली – केंद्र सरकारने दिल्ली सरकारवर कुरघोडी करून त्यांना मिळालेले अधिकार हिरावून घेतले आहेत. या लढाईत समर्थन मागण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या आठवड्यात मुंबईचा दौरा करून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
त्यांच्या निश्चित झालेल्या कार्यक्रमानुसार केजरीवाल हे 24 मे रोजी ठाकरेंना भेटतील आणि 25 मे रोजी ते शरद पवार यांना भेटणार आहेत, असे आपच्या वतीने सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने एक विशेष अध्यादेश काढून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिल्ली सरकारला दिलेला सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि बदल्यांचा अधिकार काढून घेतला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाला पुन्हा न्यायालयीन आणि राजकीय लढाई करावी लागत आहे.
या लढ्यात त्यांना कॉंग्रेसकडून अपेक्षित साथ मिळत नाही. पण त्यांनी विरोधी आघाडीतील अन्य पक्षांना आता बरोबर घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेटी घेत आहेत. केंद्र सरकारच्या विरोधातील हा लढा एकाकीपणे देता येणार नाही याची जाणीव केजरीवालांना झाली आहे. त्यामुळेच त्यांनी ही मोहीम हाती घेतली आहे.
केंद्र सरकारने दिल्ली सरकारवर जी कुरघोडी केली आहे, तो विषय केजरीवालांनी संसदेतही उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांना अन्य पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. राज्यसभेत त्यांचे काही खासदार असले तरी लोकसभेत मात्र त्यांचा केवळ एकच खासदार आहे.